Join us  

अर्थसंकल्पामुळे रिलायन्सला बंपर फायदा; अवघ्या 135 मिनिटांत कमावले 66000 कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2024 3:18 PM

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरने आज 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला.

Reliance Share Market: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी जाहीर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात हरित ऊर्जेबाबत केलेल्या घोषणेमुळे आज रिलायन्स इंडस्ट्रीच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. अवघ्या 135 मिनिटांत कंपनीच्या मूल्यांकनात सुमारे 66 हजार कोटी रुपयांची वाढ झाली. विशेष म्हणजे कंपनीच्या शेअर्सने 52 आठवड्यांचा उच्चांकही गाठला आहे. चालू वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 14 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या मते कंपनी पुढील आठवड्यात 20 लाख कोटी रुपयांचा मार्केट कॅप ओलांडू शकते. 

रिलायन्सचे शेअर्स विक्रमी पातळीवरबीएसईच्या आकडेवारीनुसार, आजच्या ट्रेडिंग सत्रादरम्यान रिलायन्स इंडस्ट्रीजने 52 आठवड्यांचा विक्रमी उच्चांक गाठला. सकाळी 11:30 वाजता रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सने 2,949.90 रुपयांची विक्रमी पातळी गाठली. एका दिवसाच्या तुलनेत, सकाळी कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 3 टक्क्यांनी वाढ झाली. तर, चालू वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 14 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तज्ञांच्या मते येत्या काही दिवसांत कंपनीचे शेअर्स आणखी वाढू शकतात.

कंपनीचा शेअर दुपारी 1:05 वाजता 2896.80 रुपयांवर आला, मात्र बाजार बंद होईपर्यंत हा पुन्हा 2915 वर पोहचला. एका दिवसापूर्वी कंपनीचे शेअर्स 2852.70 रुपयांवर बंद झाले होते. चालू आठवड्यात रिलायन्सच्या शेअर्समध्ये जवळपास 9 टक्क्यांनी वाढ झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज हरित ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात मोठी गुंतवणूक करत आहे. अशा परिस्थितीत अर्थसंकल्पात ग्रीन एनर्जीच्या घोषणेमुळे रिलायन्सच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे.

135 मिनिटांत 66000 कोटी रुपयांचा नफाआकडेवारीनुसार एका दिवसापूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीजचे मार्केट कॅप 19,30,047.36 कोटी रुपये होते. तर आज सकाळी 11.30 वाजता कंपनीचे मार्केट कॅप 19,95,809.83 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. याचा अर्थ कंपनीचे मार्केट कॅप 135 मिनिटांनंतर 65,762.47 कोटी रुपयांनी वाढले. पुढील आठवड्यात कंपनीचे मार्केट कॅप 20 लाख कोटींच्या पुढे जाऊ शकते.

सरकारच्या या योजनाचा फायदाअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रधानमंत्री सूर्योदय योजनेअंतर्गत 1 कोटी घरांमध्ये रूफटॉप सोलर पॅनेल बसवण्यासाठी मदत प्रस्तावित केली आहे. प्रधानमंत्री सूर्योदय योजनेअंतर्गत एक कोटी कुटुंबांना दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळेल. यामुळे प्रत्येक कुटुंबाची वर्षभरात 18 हजार रुपयांची बचत होणार असल्याचंही त्यांनी भाषणादरम्यान सांगितलं. प्रधानमंत्री सूर्योदय योजनेअंतर्गत, एक कोटी कुटुंबांना सौर पॅनेलद्वारे दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळणार आहे. यामुळे सौर ऊर्जा कंपनीला फायदा होऊ शकतो आणि त्याचा स्टॉकवर परिणाम होऊ शकतो.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :रिलायन्सशेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूक