Sanjiv Bajaj Exclusive : भारत देश प्रत्येक क्षेत्रातील व्यवसायासाठी मोठी संधी आहे. त्यामुळे जगभरातील व्यावसायिक इथे येण्यासाठी प्रयत्न करत असतात. पण, कोणताही व्यवसाय यशस्वी करण्यासाठी तुमच्याकडे ४ गोष्टी असायला हव्यात, असे मत बजाज फिनसर्व्हचे अध्यक्ष संजीव बजाज यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२५ पुरस्कार सोहळ्यात लोकमत मीडियाचे सहव्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांनी बजाज फिनसर्व्हचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज यांची विशेष मुलाखत घेतली. यामध्ये त्यांनी देशातील संधी, स्टार्टअप उद्योग, कामाचे तास यावर सविस्तर मत मांडले. मुंबईतील राजभवन येथे हा कार्यक्रम पार पडला.
बजाज-अलायन्झमध्ये करार का केला?
मुलाखतीच्या सुरुवातीलाच संजीव बजाज यांनी बजाज-अलायन्झ कराराला भारतीय आर्थिक क्षेत्रासाठी एक महत्त्वाचे पाऊल म्हटले आहे. बजाज फिनसर्व्ह लिमिटेडने (BFS) सोमवार (१७ मार्च) त्यांच्या सामान्य विमा आणि जीवन विमा व्यवसायाबाबत एक मोठी घोषणा केली आहे. बजाज यांनी सांगितले, की बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स (BAGIC) आणि बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्स (BALIC) मधील Allianz SE चा २६ टक्के हिस्सा खरेदी करण्यासाठी त्यांनी शेअर खरेदी करार (SPA) केला आहे. हा करार पूर्ण झाल्यानंतर बजाज समूहाची या दोन कंपन्यांमध्ये १०० टक्के भागीदारी असेल, जी आतापर्यंत ७४ टक्के होती. यापाठीमागे कंपनी एका नेतृत्वाखाली असावी अशी आमची भूमिका असल्याचे संजीव बजाज यांनी सांगितले.
स्टार्टअप सुरू करताना काय अडचणी आल्या?
नवीन व्यवसाय सुरू करण्याविषयी संजीव बजाज म्हणाले, की कोणताही स्टार्टअप यशस्वी करण्यासाठी प्रत्येक नवउद्योजक खूप मेहनत घेतात. यासाठी तो स्वतःच करिअर डावावर लावतो. स्वतःची बचतच नाही तर कुटुंबाची, मित्रांचे पैसे सर्वकाही लावतो. याबाबतीत मी नशीबवान होतो. मला मोठ्या उद्योजक कुटुंबाचा वारसा लाभला आहे. मात्र, स्वतःच्या जीवावर वेगळं काहीतरी उभं करायलाही हिंमत लागते. मी जेव्हा बजाज फिनसर्व्ह स्टार्टअप सुरू केला. त्यावेळी तो छोटा होता. मला कुटुंबातील मोठ्या सदस्यांकडून मार्गदर्शन मिळत होते. सुदैवाने मी यात अपयशी झालो नाही. परंतु, हा सर्व प्रवास रोमांचक होता.
पुढे ते म्हणाले, की माझी आई महाराष्ट्रीयन आहे. माझं स्वतःचं शिक्षण लोकल शाळेत झालं आहे. माझा मुलगाही त्याच शाळेत जातो. कारण, मला वाटतं अशा ठिकाणी मुलांचा योग्य पायाभरणी होते. माझ्या मुलाचे मित्रही स्थानिक आहेत. ते अनेकदा साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करतात.
स्टार्टअप यशस्वी करण्याचा फॉर्म्युला कोणता?
सर्वप्रथम तुमची आयडिया युनिक असायला हवी. दुसरं म्हणजे तुमच्या व्यवसायाबद्दल तुम्हाला पॅशन हवे. प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार येतात. पण, तुम्ही जर पॅशनेट असाल तर व्यवसाय यशस्वी होण्याची शक्यता जास्त आहे. तिसरं म्हणजे एक चांगली टीम तुम्ही तयार करायला हवी. कुठलाही व्यवसाय उभा करण्यासाठी चांगली टीम खूप महत्त्वाची आहे. चौथे आणि महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला फंडींग करणारा व्यक्ती तुमच्याकडे हवा. ही चतुसुत्री वापरली तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल, असं मत संजीव बजाज यांनी मांडले.