Join us  

सुब्बाराव म्हणाले, ‘तो’ काळ अग्निपरीक्षेचा

By admin | Published: July 20, 2016 11:59 PM

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर दुव्वुरी सुब्बाराव यांनी आपल्या २००८ च्या काळातील आठवणींना उजाळा देताना स्पष्ट केले की, गव्हर्नर म्हणून तो काळ आपल्यासाठी अग्निपरीक्षेसारखा होता

सिंगापूर : रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर दुव्वुरी सुब्बाराव यांनी आपल्या २००८ च्या काळातील आठवणींना उजाळा देताना स्पष्ट केले की, गव्हर्नर म्हणून तो काळ आपल्यासाठी अग्निपरीक्षेसारखा होता. हा तो काळ होता जेव्हा लेहमन ब्रदर्स सारख्या संस्था कोलमडत होत्या. तर जागतिक स्तरावरही आर्थिक क्षेत्र मरणासन्न अवस्थेत होते. एकूणच पाच वर्षांचा हा काळ म्हणजे संकटांची मालिकाच होती. पण त्या काळातील अनेक निर्णयांमुळे भारत आणि येथील अर्थव्यवस्था गडगडली नाही आणि वेळेतच सावरली ‘व्हू मूव्हड् माय इंटरेस्ट रेट्स’ या आपल्या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी बोलताना सुब्बाराव यांनी हे कबूल केले की, सुरुवातीच्या कार्यकाळात ते नवशिके होते. देशात आणि जागतिक स्तरावर हा कालखंड तसा कठीण होता. लेहमन ब्रदर्समुळे जागतिक आर्थिक क्षेत्र मरणासन्नतेचा अनुभव घेत होते. सुब्बाराव हे आरबीआयचे २२ वे गव्हर्नर होते आणि त्यांचा कार्यकाळ ५ सप्टेंबर २००८ ते ४ सप्टेंबर २०१३ पर्यंत होता. सुब्बाराव म्हणाले की, आर्थिक संकटावर उपाय करणे कठीण झाले होते. कारण, या सर्व परिस्थितीपासून ते अनभिज्ञ होते. बाजारांची माहिती समजून घेणे, व्यक्तीगत मते यासाठी कमी वेळ मिळाला. मात्र तसे असले तरी भारताच्या अर्थव्यवस्थेला जागतिक मंदीचा फटका बसू नये, यासाठी आपण प्रयत्न केले आणि मुख्य म्हणजे त्यांना यशही आले. (वृत्तसंस्था)