लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: जगभरात मंदीचे सावट असताना यंदा भारतीय अर्थव्यवस्था जबरदस्त तेजीत आहे. याचा फायदा नोकरदार वर्गाला मिळणार आहे. यंदा भारतीयांना आशिया-प्रशांत क्षेत्रातील सर्वाधिक वेतनवाढ मिळेल, असा अंदाज ‘कॉर्न फेरी’ या संस्थेने व्यक्त केला आहे. ‘कॉर्न फेरी’च्या ‘इंडिया कॉन्पेन्सेशन सर्व्हे’ नामक अहवालात ही माहिती दिली आहे. त्यात म्हटले आहे की, यंदा भारतीय कंपन्या सरासरी ९.७ टक्के वेतनवाढ देऊ शकतात. गेल्या वर्षी हा आकडा ९.५ टक्के होता. कंपन्या प्रतिभाशाली कर्मचारी आपल्यासोबत ठेवू इच्छितात. त्यामुळे यंदा अधिक वेतनवाढ मिळू शकते.
भारतातील ७०६ कंपन्यांची मते जाणून घेऊन हा अहवाल तयार करण्यात आला आहे. अहवालानुसार, यंदा आशिया-प्रशांत क्षेत्रातील इतर देश वेतनवाढीच्या बाबतीत भारतापेक्षा खूपच मागे असल्याचे दिसून येत आहे.
आशिया-प्रशांत क्षेत्रात अशी राहील वेतनवाढ
- भारत- ९.७%
- व्हिएतनाम- ६.७%
- इंडोनेशिया- ६.५%
- जपान- २.५%
कोणत्या क्षेत्रात किती वेतनवाढ?
- वित्तीय सेवा १०%
- रसायने १०%
- औद्योगिक वस्तू १०%
- वाहन ९.७%
- बांधकाम ९.६%
- आरोग्य सेवा ९.५%
- तेल व वायू ९.५%
- ग्राहक वस्तू ८.७%
- आयटी सेवा ७.८%