Join us  

उपयोगात नसलेली विमानतळे वापरणार

By admin | Published: September 25, 2015 12:09 AM

देशातील वापरात नसलेल्या विमानतळांचा वापर करण्याची योजना सरकार करीत असल्याचे नागरी उड्डयनमंत्री अशोक गजपती राजू यांनी गुरुवारी येथे सांगितले

कोलकाता : देशातील वापरात नसलेल्या विमानतळांचा वापर करण्याची योजना सरकार करीत असल्याचे नागरी उड्डयनमंत्री अशोक गजपती राजू यांनी गुरुवारी येथे सांगितले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते.आज देशात जवळपास ३१-३२ विमानतळे वापरात नाहीत. त्यातील एक कुचबिहारमध्ये (पश्चिम बंगाल) आहे. या विमानतळांचा वापर करण्यासाठी आम्हाला धोरण विकसित करावे लागेल, असे राजू म्हणाले. यातील काही विमानतळांची धावपट्टी ही जेट विमानांना उतरण्यास योग्य नाही, त्यामुळे अशा विमानतळांवर छोटी विमाने वापरणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. कोलकाता विमानतळाच्या नव्या टर्मिनलच्या देखभालीचे काम २२० दिवसांत पूर्ण करण्याचे आश्वासन मंत्री राजू यांनी दिल्याची माहिती ममता बॅनर्जी यांनी दिली. विमानतळावर पाणीगळतीच्या तक्रारी होत्या, त्याबद्दल बोलताना बॅनर्जी म्हणाल्या की, कुचबिहार विमानतळाशी संबंधित काम गतीने करण्याची विनंती केंद्र सरकारला केली आहे. पश्चिम बंगालमधीलच बालूरघाट आणि मालदा विमानतळाचे प्रश्नही यावेळी चर्चेत होते. लवकरच वापरात नसलेली विमानतळे वापरात आणण्यासाठी धोरण ठरविले जात आहे, असे राजू म्हणाले.