Join us  

भारताने ४०० टन सोनं परदेशात का ठेवलंय? काय आहे त्यामागचं खरं कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 10:17 AM

India gold reserve : भारताने अलीकडेच ब्रिटनमधून १०० टन सोने परत मागवले आहे. एवढेच सोने आणखी परत आणणार आहे. मात्र, सरकार आपलं सोने देशाबाहेर का ठेवतात?

India gold reserve : एकेकाळी भारतात सोन्याचा धूर निघत होता, असं सांगितलं जातं. स्वातंत्र्यानंतर सरकारने सोनं गहाण ठेऊन देशाला गरीबाच्या खाईतून बाहेर काढलं होतं. आजही देशाच्या तिजोरीत शेकडो टन सोने आहे. आरबीआयकडे जुलै २०२४ पर्यंत एकूण सोन्याचा साठा ८४६ टन होता. भारताचा सोन्याचा साठा ऑक्टोबरपर्यंत ६७.४४४ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की देशाच्या सोन्याच्या साठ्यातील मोठा हिस्सा विदेशात ठेवला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने बँक ऑफ इंग्लंड, स्वित्झर्लंडमधील बॅसिलमधील बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्स (BIS) आणि अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ न्यूयॉर्कमध्ये सोन्याचा साठा ठेवला आहे. या वर्षी आतापर्यंत आरबीआयने ब्रिटनमधून १०० टन सोने परत मागवले आहे. पण, सरकार देशाबाहेर सोने का ठेवते?

४१४ मेट्रिक टन सोने परदेशी तिजोरीत बंदआरबीआयच्या अहवालानुसार, देशातील एकूण सोन्याच्या साठ्यापैकी सुमारे ४१४ मेट्रिक टन सोने विदेशी तिजोरीत ठेवलेले आहे. यातील ३०८ मेट्रिक टन सोने हे देशाने जारी केलेल्या नोटांच्या समर्थनार्थ आहे. तर १०० टनांपेक्षा जास्त सोने स्थानिक पातळीवर बँकांची मालमत्तेच्या स्वरुपात ठेवले जाते. भारतात ठेवलेले सोने मुंबई आणि नागपूरच्या तिजोरीत बंद आहे.

भारतीय सोने परदेशात का ठेवले जाते?केवळ भारतच नाही तर जगातील अनेक देश आपले सोने परदेशी तिजोरीत ठेवतात. त्याचा एक उद्देश सोन्याच्या सुरक्षिततेशीही संबंधित आहे. त्याचवेळी, लंडन, न्यूयॉर्क आणि झुरिच सारख्या प्रमुख आर्थिक केंद्रांमध्ये ठेवलेले सोने आंतरराष्ट्रीय व्यवहारात सहज वापरता येते. अमेरिका आणि इंग्लंडमध्ये या सोन्याच्या तिजोरींना अनेक स्तरांसह उच्च सुरक्षा असते. ग्रॅनाईटच्या भक्कम भिंती, स्मार्ट सीसीटीव्ही कॅमेरे, अलार्म, सशस्त्र रक्षक आणि लष्करी जवानांसह पोलीस यांनी वेढलेले असते. फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ न्यूयॉर्कमध्ये सोन्याची सुरक्षा अत्यंत कडक आहे. अनेक देशांचे सोने येथे ठेवले जाते. जमिनीपासून ८० फूट खाली असलेली ही तिजोरी ९० टन स्टीलच्या सिलेंडरच्या स्वरूपात आहे.

ब्रिटनमधून १०० टन सोने परत का आणले?आरबीआयने ब्रिटनमधून आपले १०० टन सोने परत मागवले आहे. एवढेच सोनं अजून परत मागवणार आहे. १९९० च्या दशकात आरबीआयने ४०० दशलक्ष डॉलर्सचे कर्ज घेतले होते. या कर्जासाठी रिझर्व्ह बँकेला बँक ऑफ इंग्लंडमध्ये सोने गहाण ठेवावे लागले होते. या कर्जाची काही वर्षांनी परतफेड करण्यात आली. परंतु, सोने परत आणण्याशी संबंधित आव्हाने लक्षात घेऊन ते तेथेच जमा करण्यात आले. यानंतरही भारताने सोने खरेदी करणे आणि BOE च्या तिजोरीत ठेवणे सुरूच ठेवले. परदेशी बँकेत ठेवण्याचा मोठा खर्च वाचवण्यासाठी आता सोने परत आणले जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

भारताच्या मंदिरांमध्ये अफाट सोनेभारताच्या तिजोरीत अमेरिकन सरकारच्या तिजोरीपेक्षा तिप्पट सोने ठेवले आहे. पद्मनाभ स्वामी मंदिर, तिरुपती बालाजी मंदिर, जगन्नाथ मंदिर, वैष्णो देवी मंदिर आदी मंदिरांमध्ये ४००० टनांपेक्षा जास्त सोने ठेवले आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने ही आकडेवारी दिली आहे. भारतीयांचे सोन्यावर इतके प्रेम आहे की २५ हजार टनांहून अधिक सोने आभूषण म्हणून घालत आहेत.

टॅग्स :सोनंभारतीय रिझर्व्ह बँक