PM Awas Yojana Scheme: स्वत:चं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. यासाठी लोक वर्षानुवर्षे मेहनत करतात, पैसे जमवतात, पण अनेकदा सर्व प्रयत्न करूनही घर विकत घेणं किंवा बांधणं शक्य होत नाही. अशा लोकांच्या मदतीसाठी केंद्र सरकारनं २०१५ मध्ये पंतप्रधान आवास योजना (PMAY) सुरू केली. या योजनेअंतर्गत आतापर्यंत कोट्यवधी लोकांना घरं खरेदी करण्यासाठी मदत करण्यात आली आहे.
या योजनेचा लाभ देण्यासाठी सरकारनं काही पात्रतेच्या अटी घातल्या आहेत. विशेषतः उत्पन्नाच्या आधारे या योजनेसाठी कोण अर्ज करू शकेल हे ठरवले जातं. जर तुम्हीही घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आधी हे जाणून घेणं गरजेचं आहे की, तुमचं वार्षिक उत्पन्न या योजनेच्या कोणत्या श्रेणीअंतर्गत येतं.
कोण करू शकतं अर्ज?
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस), अल्प उत्पन्न गट (एलआयजी) आणि मध्यम उत्पन्न गट (एमआयजी) अशा तीन मुख्य श्रेणी तयार करण्यात आलेत. - ईडब्ल्यूएस (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक): जर एखाद्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपयांपर्यंत असेल तर ते या श्रेणीत येतात आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता. एलआयजी (अल्प उत्पन्न गट) : या श्रेणीत अशा लोकांचा समावेश आहे ज्यांचे वार्षिक उत्पन्न ३ लाख ते ६ लाख रुपयांच्या दरम्यान आहे. एमआयजी-१ (मध्यम उत्पन्न गट १) : जर तुमचं वार्षिक उत्पन्न ६ लाख ते १२ लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्ही या श्रेणीत मोडता.
कोणाला मिळणार नाही याचा लाभ?
जर तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर आधीच पक्कं घर असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. तुम्ही यापूर्वी सरकारी गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतला असला तरी तुम्ही या योजनेसाठी पात्र नाही.
कसा करायचा अर्ज?
जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर पंतप्रधान आवास योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता. याशिवाय जवळच्या सरकारी बँकेतून किंवा अधिकृत केंद्रातूनही अर्ज करता येतील.