Join us  

केवळ २ वर्ष आपल्या कमाईवर वापरा ६७:३३ चा फॉर्म्युला; कठीण काळात कोणाकडे मदत मागावी लागणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 10:42 AM

Emergency Fund : आपात्कालिन परिस्थिती कधी उद्भवू शकते हे सांगता येत नाही. अशा स्थितीत मोठ्या प्रमाणात पैशांची गरज भासू शकते. यासाठीच किमान २ वर्ष नियोजन केलं तर तुम्ही टेन्शन फ्री राहू शकता.

Emergency Fund : आपात्कालिन परिस्थिती कधी उद्भवू शकते हे सांगता येत नाही आणि अशा परिस्थितीत आपल्याला इमर्जन्सी फंडाची म्हणजेच आपात्कालिन निधीची गरज भासू शकते. आपत्कालीन निधी ही कठीण काळात उपयोगी पडणारी रक्कम आहे. आजकाल लोक भविष्याचे नियोजन करतात, पण आपत्कालीन निधीचा गांभीर्यानं विचार करत नाहीत. 

पण खऱ्या अर्थानं कठीण काळ कधीही कोणाच्याही समोर येऊ शकतो. अशावेळी तुमच्याकडे इमर्जन्सी फंड नसेल तर तुमचे भविष्य सुरक्षित करणाऱ्या बचतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. तसंच इतरांसमोर मदतीसाठी हात पसरावा लागू शकतो. त्यामुळे तुमच्या कमाईवर ६७:३३ फॉर्म्युला फक्त दोन वर्षांसाठी लागू करा, त्यानंतर कठीण काळाला सामोरं जाण्यासाठी तुमच्याकडे इतके पैसे असतील की ना तुम्हाला तुमच्या बचतीला पटकन हात लावावा लागेल ना तुम्हाला कोणाकडून मदत घ्यावी लागेल.

जाणून घ्या काय आहे फॉर्म्युला?

६७:३३ फॉर्म्युला लागू करण्यासाठी तुम्हाला तुमच्या कमाईचे दोन भाग करावे लागतील. हे भाग ६७:३३ या प्रमाणात असतील. यातील ३३ टक्के रक्कम बचत करून गुंतवणूक करावी लागेल आणि याच्या मदतीनं तुम्हाला स्वत:साठी आणि कुटुंबासाठी इमर्जन्सी फंड तयार करावा लागेल. त्यानुसार तुम्ही उर्वरित रक्कम खर्च करू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्ही महिन्याला ५०,००० रुपये कमावत असाल तर तुम्हाला तुमचा पगार ३३,५०० रुपये आणि १६,५०० रुपये अशा दोन भागांमध्ये विभागावा लागेल. यापैकी १६,५०० रुपये बचत म्हणून काढावे लागतील आणि ३३,५०० रुपये तुम्ही गरजेनुसार वापरू शकता.

किती असावा इमर्जन्सी फंड?

आर्थिक तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, साधारणपणे सहा महिन्यांसाठी इमर्जन्सी फंड तयार केला पाहिजे. परंतु आपण किमान १ वर्षासाठी आपत्कालीन निधी तयार करणं आवश्यक आहे. ही रक्कम तुमच्या वर्षभराच्या मासिक खर्चाएवढी असावी. जर तुमचा घरखर्च दरमहा ३३,००० रुपये असेल तर तुमच्याकडे ३,९६,००० रुपये म्हणजेच जवळपास ४ लाख रुपये इमर्जन्सी फंड म्हणून असणं आवश्यक आहे. कठीण काळात तुमच्याकडे जितके जास्त पैसे असतील तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे.

२ वर्षांत इमर्जन्सी फंड तयार होईल

समजा तुमचा पगार ५०,००० आहे, त्यापैकी तुम्ही सलग ३३ टक्क्यांच्या हिशोबानं दरमहा १६,५०० रुपयांची बचत कराल तर, दोन वर्षांत तुमच्याकडे ३,९६,००० रुपये होतील. पण जर तुम्ही दरमहा बचतीची ही रक्कम एखाद्या योजनेत गुंतवली तर तुम्ही दोन वर्षांत अधिक फंड तयार करू शकता. यासाठी तुम्हाला बचत रकमेतून दोन वर्षांचा एसआयपी किंवा आरडी सुरू करावी लागेल.

जर तुम्ही दोन वर्षांसाठी १६,५०० रुपयांची एसआयपी सुरू केली आणि तुम्हाला सरासरी १२ टक्के परतावा मिळाला तर तुम्हाला ३,९६,००० च्या गुंतवणुकीवर ५३,५१३ रुपये व्याज मिळेल. अशा प्रकारे तुम्ही ४,४९,५१३ रुपये जोडू शकता. स्टेट बँकेबद्दल बोलायचं झालं तर, या ठिकाणी दोन वर्षांसाठी आरडी सुरू केल्यास २ वर्षात तुम्हाला त्यावर ६.८ टक्के दरानं २९,१३५ रुपये व्याज मिळेल. अशा प्रकारे तुम्ही दोन वर्षांत ४,२५,१३५ रुपये जमवू शकता.

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

 

टॅग्स :गुंतवणूकपैसा