Pakistan Stock Market :पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या डबघाईला आली आहे. महागाईने सर्वसामान्य लोकांचं कंबरडं मोडलं आहे. सरकारी व्यवस्था चालवायलाही या देशाला कर्ज काढावं लागत आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानकडून दहशतवादाला खतपाणी घालण्याचा प्रकारत म्हणजे स्वतःसाठी खड्डा खणणे आहे. काश्मीरमधील पहलगाममध्ये २९ निष्पाप पर्यटकांचा जीव घेण्यात आला. या हल्ल्यापाठीमागे पाकिस्तानचा हात असल्याचे बोलले जात आहे. या घटनेनंतर भारताने पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्यास सुरुवात केली आहे.
काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने उचललेल्या कठोर राजकीय पावलांमुळे पाकिस्तानच्या शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशीही घसरण सुरूच आहे. गुरुवारी, पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजवर बाजार उघडताच, सुरुवातीच्या व्यवहाराच्या पाच मिनिटांत, बेंचमार्क ASE-१०० सुमारे २.१२ टक्क्यांनी म्हणजेच २,४८५.८५ अंकांनी घसरून ११४,७४०.२९ वर पोहोचला. भौगोलिक तणावादरम्यान, या प्रकरणाबाबत गुंतवणूकदारांमध्ये एक विशेष भीती दिसून येत आहे.
सिंधू पाणी करार रद्द करण्याचा सर्वात मोठा निर्णय
भू-राजकीय तणावामुळे पाकिस्तानच्या शेअर बाजारातील गुंतवणूकदार सध्या चिंतेत आहेत. बुधवारी, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानविरुद्ध अनेक महत्त्वाची पावले उचलण्याचा निर्णय जाहीर केला. ज्यामध्ये सिंधू पाणी करार रद्द करण्याचा सर्वात मोठा निर्णय आहे. पाकिस्तानमध्ये भीतीदायक वातावरण असल्याने लोक त्यांचे पैसे पटापट काढून घेत आहेत, त्यामुळेच सलग २ दिवसांपासून घसरणीचा ट्रेंड सुरू आहे. एक दिवस आधी बुधवारी पाकिस्तानच्या शेअर बाजारातही मोठी घसरण दिसून आली. कराची स्टॉक एक्सचेंज (केएसई-१०० इंडेक्स) १,३०३.२९ अंकांनी घसरून १,१७,१२७.०६ वर बंद झाला.
वाचा - दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
पाकिस्तानमधील अस्थिर वातावरणात गुंतवणूकदार खूप सावध झाले आहेत. याचा परिणाम पाकिस्तानच्या प्रमुख शेअर्सवरही झाला जसे की - युनायटेड बँक लिमिटेड (UBL), हब पॉवर कंपनी (HUBC), हबीब मेट्रो बँक (HMB), मारी पेट्रोलियम (MARI) आणि एंग्रो कॉर्प (ENGRO) सारख्या प्रमुख कंपन्यांचे शेअर्स घसरले आहेत.