Tata Capital IPO: टाटा सन्सच्या संचालक मंडळाची आज बैठक आहे. या बैठकीत टाटा सन्स उदयोन्मुख व्यवसायांच्या पुढील फेरीसाठी निधी वाटपावर चर्चा करेल. टाटा डिजिटल, एअर इंडिया आणि टाटा इलेक्ट्रॉनिक्स या कंपन्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. याशिवाय टाटा समूहातील कंपन्यांच्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालांवरही संचालक मंडळ चर्चा करणार आहे.
इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, टाटा कॅपिटलच्या प्रस्तावित दोन अब्ज डॉलरच्या आयपीओच्या प्रगती अहवालावरही संचालक मंडळ चर्चा करणार आहे. टाटा सन्सच्या अध्यक्षांनी नवीन व्यवसायांमध्ये गुंतवणुकीची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आर्थिक वर्ष २०२७ पर्यंत लक्ष्य ठेवलंय. तसंच, सर्व नवीन व्यवसाय महसूल आणि नफ्याच्या बाबतीत टॉप ५ कंपन्यांमध्ये येतात. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर टाटा सन्सकडून कोणतंही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेलं नाही. एन. चंद्रशेखरन यांनी २०१७ मध्ये सूत्रं हाती घेतली. २०२२ मध्ये त्यांची पुन्हा एकदा ५ वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली. त्यांचा दुसरा कार्यकाळ फेब्रुवारी २०२७ मध्ये संपणार आहे.
या कंपन्यांच्या गुंतवणूकीवर भर देणार
टाटा समूहाचे प्रमुख गुंतवणूकदार टाटा इलेक्ट्रॉनिक्स, टाटा डिजिटल, एअर इंडिया आणि बॅटरी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहेत. येत्या काही वर्षांत त्याची अंदाजित गुंतवणूक १२० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त असेल. नव्या उपक्रमांमध्ये टाटा समूह इक्विटी गुंतवणूक आणि अंतर्गत नफ्याच्या माध्यमातून गुंतवणूक करणार आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये समूहाला केवळ २४,००० कोटी रुपयांचा लाभांश मिळाला. यात सर्वात मोठा वाटा टीसीएसचा होता. कंपनीनं समूहाला १९ हजार कोटी रुपयांचा लाभांश दिला होता. तर, टाटा मोटर्सकडून २००० कोटी रुपये आणि टाटा स्टीलकडून १४५० कोटी रुपयांचा लाभांश मिळाला.
टाटा कॅपिटलच्या आयपीओवर भर
समूहाने टाटा कॅपिटलच्या दोन अब्ज डॉलरच्या आयपीओसाठी कोटक इन्व्हेस्टमेंट बँकिंगची बँकर म्हणून नियुक्ती केली आहे. या कंपनीत टाटा सन्सचा ९३ टक्के हिस्सा आहे. टाटा इलेक्ट्रॉनिक्स, एअर इंडिया आणि टाटा डिजिटल येत्या दोन वर्षांत स्वावलंबी होतील आणि त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल, असं समूहाचे उद्दिष्ट आहे.
टाटा सन्सचा निव्वळ नफा २०२३-२४ या आर्थिक वर्षात ३४,६५४ कोटी रुपये झालाय. टाटा सन्सच्या निव्वळ नफ्यात ५७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. समूहातील लिस्टेड कंपन्यांचं उत्पन्न ३० टक्क्यांनी वाढून ११.२३ लाख कोटी रुपयांवर पोहोचलंय. तर निव्वळ नफा ९.४ टक्क्यांनी वाढून ८६,५०० कोटी रुपये झाला आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)