Ind Vs South Africa 1st Test: मंगळवारपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेला सुरूवात झाली आहे. तर, दुसरा सामना ७ जानेवारीपासून खेळवला जाणार आहे. सलामीचा सामना २६ ते ३० डिसेंबर दरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क येथे खेळवला जात आहे. पहिल्या दिवसअखेर यजमान आफ्रिकेने मजबूत पकड बनवली असून, भारताने ८ गडी गमावून २०८ धावा केल्या आहेत. यष्टीरक्षक फलंदाज लोकेश राहुल सर्वाधिक ७० धावा करून खेळपट्टीवर टिकून आहे.
या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारतावर कमालीचे वर्चस्व गाजवले. भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्माचे कसोटी मालिकेतून पुनरागमन झाले आहे. वन डे विश्वचषकातील पराभवानंतर प्रथमच रोहित आणि विराट कोहली मैदानात आहेत. पहिल्या सामन्यात भारताचा सलामीवीर रोहित शर्मा स्वस्तात बाद झाला अन् दक्षिण आफ्रिकेने सुरूवातीपासूनच मजबूत पकड बनवली. रोहित शर्माच्या फलंदाजीवर टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांचे मत आहे की, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा ज्या पद्धतीने बाद झाला त्याच्या खेळीवर चाहत्यांनी नाराज होऊ नये. कारण रोहितने याआधी देखील असा फटका मारला असून त्याला काहीवेळा अपयश आले आहे. केवळ पाच धावांवर असताना कसिगो रबाडाने रोहितला बाहेरचा रस्ता दाखवला. उत्साहाच्या भरात पुल शॉट मारताना रोहित बाद झाला. डावाच्या पाचव्या षटकात कर्णधार रोहित शर्मा कगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर शिकार झाला.
पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), आर अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.
पहिल्या कसोटीसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ -टेम्बा बावुमा (कर्णधार), डीन एल्गर, एडन मार्करम, टोनी डी जिओर्गी, कीगन पीटरसन, डेव्हिड बॅडिंगहॅम, काइल वॉरेन (यष्टीरक्षक), मार्को यान्सिन, जेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर.