पती-पत्नीच्या वादात पाच महिन्यांच्या बाळाची हत्या करून टाकले विहिरीत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 12:03 PM2023-02-21T12:03:00+5:302023-02-21T12:03:23+5:30
सूरज आणि गायत्री माळी हे दाम्पत्य कोपरगाव तालुक्यातील कारवाडी शिवारात राहत असून, मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते.
कोपरगाव (जि. अहमदनगर) : पती-पत्नीच्या वादात आपल्या पाच महिन्यांच्या बाळाची आईनेच मारहाण करत गळा दाबून हत्या केली. त्यानंतर बाळाचा मृतदेह विहिरीत टाकला. दोन अज्ञात इसमांनी बाळाला पळवून नेल्याचा बनाव बाळाच्या आईने केला होता. मात्र, पोलिसांनी घेतलेल्या संशयामुळे आईनेच बाळाची हत्या केल्याचे उघड झाले. याप्रकरणी पतीच्या फिर्यादीवरून पत्नीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
सूरज आणि गायत्री माळी हे दाम्पत्य कोपरगाव तालुक्यातील कारवाडी शिवारात राहत असून, मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. पती सूरज हा पत्नी गायत्रीवर अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत असल्याने दोघांमध्ये वाद व्हायचे. या वादातूनच गायत्रीने रागाच्या भरात आपल्या शिवम नावाच्या पाच महिने सात दिवसांच्या बाळाला मारहाण करून गळा आवळून खून केला. बाळाचा मृतदेह जवळच असलेल्या शेतातील विहिरीत फेकून दिला. काही अज्ञात लोकांनी येऊन मुलाला पळवून नेल्याचा बनाव केला. पोलिसांना बाळाची आई गायत्रीवर संशय आला. त्यादृष्टीने तपास केला असता तिने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. रोजच्या भांडणाच्या कारणावरून रागाच्या भरात स्वतःच्या बाळाला मारहाण करून गळा दाबून हत्या केल्याचे तिने सांगितले.