Join us  

'पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर हिंदुस्थानात ...', अयोध्या राम मंदिर सोहळ्याबद्दल मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 9:27 AM

'आई कुठे काय करते' फेम अभिनेता मिलिंद गवळींनी अयोध्या राम मंदिर सोहळ्याबद्दल खास पोस्ट लिहीली आहे.

अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Naredra Modi) यांच्या हस्ते रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोमवारी (२२ जानेवरी) करण्यात आली. या सोहळ्यासाठी बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटींनी उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्यानंतर सेलिब्रिटी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत.  'आई कुठे काय करते' फेम अभिनेता मिलिंद गवळींनीअयोध्याराम मंदिर सोहळ्याबद्दल खास पोस्ट लिहीली आहे. अयोध्येतील राम मंदिर आणि सोमवारी देशभरात असलेलं वातावरण यावर  त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

मिलिंद गवळीं यांनी मालिकेच्या सेटवरील एक व्हिडीओ शेअर केला. तर पोस्टमध्ये त्यांनी लिहलं, कालचा दिवस फार मंगलमय होता, काल रामलल्ला अयोध्येत विराजमान झाले,काल बारा वाजून वीस मिनिटाच्या मुहूर्तावर अयोध्यातील राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाली, पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर, भारतात हिंदुस्थानात हा दिवस उजाडला'.

त्यांनी लिहलं, '4000 वेगवेगळ्या पंथाचे साधू संत तीन हजारांहुन अधिक vvip अतिथी, शंभरहून अधिक प्रायव्हेट जेट विमान, विमानांना एवढ्या पार्किंगची सोय नसल्यामुळे वेगळ्या राज्यात विमान पार्क केलेली होती. सुपरस्टार्स कलाकार, खेळाडू. कालच्या दिवशी आयोध्येमध्ये आपण पण असायलाच हवं होतं. असं असं मला पण वाटत होतं, पण नंतर विचार केला की मला आमंत्रण दिलं नाही. कारण माझ्या घरीच राम आहे. वडिलांचं नावच “श्रीराम” आहे'.

 मिलिंद गवळी पुढे लिहतात, 'पण आयोध्येत आणि देशात हा उत्सव चालू असताना मी रामासारखं आपण आपलं कर्तव्य करत राहायचं असं ठरवलं. मी माझं काम म्हणजेच सध्या, “आई कुठे काय करते” या मालिकेचे शूटिंग करत होतो, सकाळी सेटवर पोहोचल्यानंतर नमस्कार गुड मॉर्निंगच्या ऐवजी “जय श्रीराम “म्हणत सगळे एकमेकांचं स्वागत करत होते'. 

पुढे त्यांनी लिहलं, 'आमचे सीन्स पण किती interesting होते बघा, डॉक्टर अभी घर सोडून नोकरी करण्यासाठी कॅनडाला जातो आहे, तो परत केव्हा येईल कधी येईल , येईल की नाही याची कोणाला शाश्वती नाही आहे. त्याचा धाकटा भाऊ यश त्याला मिठी मारून ढसाढसा रडतोय.मग माझ्या, म्हणजेच अनिरुद्धच्या, म्हणजेच त्याच्या वडिलांच्या पाया पडून निघायला लागतो, आणि मग अनिरुद्ध एक बाप मुलाला मिठी मारून रडतो, माझ्या डोक्यामध्ये सगळं वातावरण इतकं राममय झालं होतं, की serial च्या scenes मध्ये मला वनवास, भरत भेट. असंच काहीसं जाणवत होतं'.

 'डोक्यामध्ये अनेक विचार येत आहेत, की इतका छान राममय वातावरण अख्या जगात झाला आहे तर, रामाची शिकवण आपल्यामध्ये रुजवण्याची गरज आहे असं मला वाटतं. मातृ-पितृ भक्ती, भावंडांवर असीम प्रेम, कर्तव्य, त्याग, कोणाही विषयी कटूता न बाळगणे, सतत प्रसन्न आणि आनंदी राहणे, सत्याचा नेहमी विजय होतो. असं काहीसं आपल्यामध्ये सुद्धा आपण आत्मसात करावं आणि पुढच्या पिढीला ही ते द्यावं. जय श्रीराम', या शब्दात मिलिंद गवळी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

 

टॅग्स :मिलिंद गवळीअयोध्यासेलिब्रिटीराम मंदिरआई कुठे काय करते मालिका