मुंबई - सोशल मीडियाच्या काळात अनेकदा कॅनडाच्या नागरिकत्वावरून बॉलिवूड स्टार अक्षय कुमारला टीकेचा सामना करावा लागला. मात्र, भारताच्या ७७ व्या स्वातंत्र्य दिनी अक्षयने त्याच्या चाहत्यांना आणि ट्रोलर्संनाही मोठं गिफ्ट दिलंय. अक्षयने कॅनडाचं नागरिकत्व सोडलं असून आता तो मनाने आणि नागरिक म्हणूनही भारतीय बनला आहे. अक्षयने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन भारतीय नागरिक असल्याचं प्रमाणपत्र शेअर केलं आहे. तसेच, दिल और सिटीझनशीपही हिंदुस्तानी, असल्याचं अक्षयने म्हटलं आहे.
कॅनडाच्या नागरिकत्वावरून अनेकदा अक्षयच्या भूमिकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होते. दरम्यान, आता “भारतच माझं सर्वस्व आहे आणि पासपोर्टमध्ये बदल करण्यासाठी अर्ज केला आहे,” असं अक्षयकुमारनं यापूर्वीच म्हटलं होतं. जेव्हा लोक आपल्याला कॅनडाचं नागरिकत्व घेण्यामागील कारण न समजता बोलातात तेव्हा वाईट वाटतं, असं त्याने एका मुलाखतीत म्हटलं होतं. तसेच, कॅनडाचे नागरिकत्व स्वीकारण्याचं कारणही स्पष्ट केलं होतं.
काही महिन्यांपूर्वी अक्षय कुमारने कॅनडाच्या नागरिकत्वावरून होणाऱ्या टीकेवर प्रतिक्रिया दिली होती. अक्षय म्हणाला होता, ९० च्या दशकात त्याचे चित्रपट चालत नव्हते म्हणून त्याने कॅनेडियन नागरिकत्वासाठी अर्ज केला होता. मी कामासाठी कॅनडामध्ये गेलो. मात्र, माझे दोन चित्रपट प्रदर्शित झाले आणि नशिबाने ते सुपरहिट ठरले. त्यानंतर, अक्षय कुमार भारतातील बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणून देशभर सुपरहीटही झाला. “भारत माझ्यासाठी सर्वस्व आहे. मी जे काही कमावलंय, जे काही मिळवलंय ते इथूनच मिळालंय. मला त्याची परतफेड करण्याची संधी मिळतेय हे मी माझं भाग्य मानतो. जेव्हा काहीही माहित नसताना लोक बोलतात तेव्हा वाईट वाटतं,” असं अक्षय कुमारने म्हटलं होतं.
आता, अक्षय कुमारने भारतीय नागरिकत्त्वाचं प्रमाणपत्र शेअर करत सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दिल और सिटीझनशीप दोनोही हिंदुस्तानी... जय हिंद.. असे अक्षय कुमारने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यासोबतच, भारतीय नागरिकत्त्वाचं प्रमाणपत्राचा फोटोही त्याने शेअर केला आहे.