Join us  

नवीन सस्पेन्स 'हाकामारी’ सिनेमाची घोषणा, सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 10:49 PM

या चित्रपटाचे दिग्दर्शन फिल्मफेअर पुरस्कार विजेते दिग्दर्शक समीर विध्वंस करणार असून या सिनेमाच्या कथेबद्दल अजूनपर्यंत कोणतीही अधिक माहिती समोर आलेली नाही.

सस्पेन्स चित्रपट नेहमीच प्रेक्षकांसाठी एक वेगळा आणि चांगला पर्याय आहे. सस्पेन्स चित्रपटांसाठी प्रेक्षक नेहमीच उत्साही असतात. शिवाय हे सिनेमे रसिकांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारे सुद्धा ठरतात. मात्र एखाद्या सिनेमाची कथा ही फक्त कल्पनेपुरती मर्यादित नसेल तर? मनोरंजन विश्वात असे अनेक सिनेमे आहेत जे केवळ काल्पनिक नसून सत्य घटनांवर आधारित आहेत. असाच एक सस्पेन्स सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे नाव आहे 'हाकामारी'. या चित्रपटाचे दिग्दर्शन फिल्मफेअर पुरस्कार विजेते दिग्दर्शक समीर विध्वंस करणार असून या सिनेमाच्या कथेबद्दल अजूनपर्यंत कोणतीही अधिक माहिती समोर आलेली नाही.

 

मुळात या चित्रपटाचे नावच अतिशय वेगळे आणि उत्सुकता निर्माण करणारे आहे. 'हाकामारी’ हा शब्द अनेकांसाठी नवीनच असेल, मात्र सिनेमा आल्यानंतर सर्वांनाच या शब्दाचा अर्थ उमगणार आहे. फिल्मफेअर पुरस्कार विजेते दिग्दर्शक समीर विध्वंस यांनी २०१३ मध्ये ‘टाईम प्लिज’ या धमाकेदार सिनेमाने त्यांच्या दिग्दर्शकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी आतापर्यंत धुराळा, आनंदी गोपाळ, डबलसीट, वायझेड, मला काहीच प्रॉब्लेम नाही आदी यशस्वी सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे.

 

अक्षय बर्दापूरकर सांगतात, " 'हाकामारी' हा अतिशय वेगळा सस्पेन्स सिनेमा असणार आहे. या चित्रपटाची कथा लोककथा, गूढता, प्रेम आणि भयपट आदी सर्व विषयांना धरून पुढे जाणारी आहे. हा सिनेमा प्लॅनेट मराठीचा पहिला वेब सिनेमा आहे. या सिनेमामुळे आम्ही एका मोठ्या आणि वेगवान जगात जाणार आहोत, याचा आम्हाला सर्वात जास्त आनंद आहे.

यातील अनेक चित्रपटांनी राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय पातळीवर वाहवा मिळवली आहे. लवस्टोरी सिनेमांमध्ये समीर यांचा हातखंडा आहे. तरीही या सिनेमाच्या निमित्ताने समीर पहिल्यांदाच एका भयपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या सिनेमाची कथा 'दिल दिमाग और बत्ती' फेम आणि साहित्य परिषदेचे पुरस्कार प्राप्त लेखक ऋषिकेश गुप्ते यांनी लिहिली असून त्यांनी आतापर्यंत दंशकाल, दैत्यालय, अंधारवारी, कलजुगरी आदी अनेक मोठ्या आणि गाजलेल्या कादंबऱ्या लिहिल्या आहेत. अक्षय बर्दापूरकर, सोनाली कुलकर्णी आणि समीर विध्वंस यांनी केलेल्या या सिनेमाच्या घोषणेमुळे प्रेक्षकांमध्ये उत्साह निर्माण होणार हे नक्की.

 

टॅग्स :सोनाली कुलकर्णी