Join us  

'ऐश्वर्या'नं 'ए दिल...'चे प्रमोशन न करण्याचे कारण 'अनुष्का'?

By admin | Published: October 15, 2016 2:40 PM

ऐश्वर्या तर रणबीर कपूरसोबत सिनेमाचे प्रमोशन करू शकते. मग ती प्रमोशन का करत नाही? ती नाराज आहे का? तर असे नाही, याचे खरे कारण आहे अनुष्का शर्मा.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 15 -  बॉलिवूडचा चॉकलेट हिरो 'रणबीर कपूर' सध्या 'ए दिल है मुश्किल' सिनेमाचे प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. दिग्दर्शक-निर्माता करण जोहरचा आगामी सिनेमा 'ए दिल है मुश्किल'मध्ये अनुष्का शर्मा, ऐश्वर्या राय-बच्चन आणि रणबीर कपूर या तिघांचीही मुख्य भूमिका आहे. मात्र एकटा रणबीरच सिनेमाचे प्रमोशन करताना दिसत आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या जाऊ लागल्या आहेत. अनुष्का शर्मा इम्तियाज अलीच्या आगामी सिनेमामध्ये शाहरुख खानसोबत दिसणार आहे. त्यामुळे शुटिंगनिमित्त परदेशात असल्याने ती सिनेमाचे प्रमोशन करू शकत नाही. मात्र, ऐश्वर्या तर रणबीर कपूरसोबत सिनेमाचे प्रमोशन करू शकते. मग ती प्रमोशन का करत नाही? ती नाराज आहे का? तर असे नाही, याचे खरे कारण आहे अनुष्का शर्मा.
 
आणखी बातम्या
 
कारण, दोन्ही अभिनेत्रींनी एकत्रित सिनेमाचे प्रमोशन करण्याचे सिनेमाच्या टीम ठरवले आहे. 'सिनेमामध्ये अनुष्का शर्माच्या तुलनेत ऐश्वर्याची भूमिका छोटी आहे. अनुष्काचा लीड रोल असताना, ऐश्वर्याने तिच्याशिवाय सिनेमाचे प्रमोशन केल्यास प्रेक्षकांमध्ये चुकीचा संदेश  जाऊ  शकतो, असे सिनेमाच्या टीमला वाटते आहे', अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे भांडण, वाद, राग वगैरे काही नाही फक्त 'स्ट्रॅटेजिक' निर्णयामुळे ऐश्वर्या सिनेमाचे प्रमोशन करत नसल्याचे म्हटले जात आहे. 
 
दरम्यान, सिनेमामध्ये पाकिस्तानी कलाकार फवाद खान असल्यामुळे आधीच सिनेमा वादात अडकला आहे. त्यामुळे दिग्दर्शक-निर्माता करण जोहरनेही मीडियापासून लांब राहणेच पसंत केले आहे. उरी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील संबंध अधिक ताणले गेल्याचा फटका पाकिस्तानी कलाकार असलेल्या बॉलिवूडमधील सिनेमांना बसतो आहे.  त्यामुळे 'ए दिल है मुश्किल' आणि 'रईस' या सिनेमांच्या प्रदर्शनावर टांगती तलवार कायम आहे.