छोट्या पडद्यावरील अशा मोजक्या मालिका आहेत ज्यांनी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. अशाच मालिकांपैकी एक म्हणजे 'अप्पी आमची कलेक्टर'. झी मराठी वाहिनीवरील या मालिकेतून छोट्याशा खेडेगावात राहणाऱ्या अप्पीचा कलेक्टर होण्यापर्यंतचा जिद्दीचा प्रवास दाखविण्यात आला. या मालिकेतून दाखवलेली एका प्रेरणादायी कलेक्टरची गोष्ट प्रेक्षकांना भावली. मात्र, या मालिकेने आता प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.
'अप्पी आमची कलेक्टर' मालिका बंद झाली आहे. अडीच वर्षांनी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये मालिकेचा पहिला भाग प्रसारित करण्यात आला होता. तर शनिवारी(१५ मार्च) 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला. या मालिकेने निरोप घेतल्याने चाहते नाराज आहेत. मालिका संपल्यानंतर मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी नाईकने भावुक पोस्ट शेअर केली आहे.
"845 भागांचा अविस्मरणीय, अनुभवी, प्रेरणादायी आणि बरच काही सांगून, देऊन, शिकवून जाणारा हा प्रवास. Thank you so much @zeemarathiofficial ,@vajraprod ,@shwetashinde_official ,@sanjay_khambe_official for this incredible love, support ,faith and respect towards me 🙏 अणि❤️ सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार 🥰 मी कायमच तुमच्या सेवेस तत्पर राहीन", असं शिवानीने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत अभिनेत्री शिवानी नाईकने कलेक्टर अपर्णाची भूमिका साकारली होती. तर अभिनेता रोहित परशुराम अर्जुनच्या भूमिकेत होता. मालिकेतील अप्पी-अर्जुनची प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. अमोल म्हणून मालिकेत एन्ट्री घेत बालकलाकार साईराज केंद्रेने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती.