९०च्या दशकातील ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर ही हिट जोडी आजही प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करते. नव्या पिढीशी सांगड घालत नारकर कपल सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेक ट्रेंडिंग गाण्यावर ते रील बनवतात. त्यांच्या रीलला चाहत्यांकडून पसंतीही मिळते. पण, अनेकदा त्यांना ट्रोलही केलं जातं. या ट्रोलर्सला अविनाश नारकर यांनी आता सडेतोड उत्तर दिलं आहे.
अविनाश नारकर यांचं ट्रोलर्सला उत्तर
"आपल्या अशा वागण्याचा किंवा असं असण्याचा समोरच्या व्यक्तीला त्रास होतोय आणि त्यावर भाष्य करून त्याला आनंद मिळत असेल. तर तो आनंद त्याला मिळू द्यावा आणि त्याने तो घ्यावा. यावर माझं काहीच म्हणणं नाही. आम्हाला जे करायचंय ते आम्ही करणार. ट्रोलिंग करणाऱ्यांचा आम्ही मान ठेवतो. निंदकाचे घर असावे शेजारी...जितके निंदक तुमच्या अवतीभोवती असतील तेवढं छान असतं. प्रतिकूल परिस्थितीत माणूस जास्त उभारी घेतो. अवतीभोवती जितकी प्रतिकूल परिस्थिती जास्त तितका जोश जास्त", असं अविनाश नारकर तारांगण या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.
...म्हणून आम्ही रील बनवतो
अविनाश नारकर यांनी रील बनवण्यामागचं खरं कारण सांगून टाकलं आहे. केवळ आनंदासाठी रील बनवत असल्याचं अविनाश यांनी म्हटलं आहे. अविनाश नारकर म्हणाले, "आम्ही आम्हाला जे आवडतं किंवा भावतं तेच करतो. जगण्यामध्ये सध्या तुटकपणा आलेला आहे. त्यामुळे टवटवीत जगणं अनुभवण्याचा आपण प्रयत्न करूया असं माझं आणि ऐश्वर्याचं म्हणणं असतं. आणि ज्या वेळेला आम्हाला हा रसरशीतपणा जाणवतो तेव्हा आम्ही रील करतो. जेव्हा आम्ही एकदम थकून भागून आलेलो असतो. तेव्हा दिवसभराचा कंटाळा घालवण्यासाठी आमच्यासाठी रील हे अतिशय उत्तम असं साधन आहे. आतून ते इतकं उत्स्फुर्तपणे येतं की ते सगळ्यांना भावतं. हे असं आम्हाला जगायचं आहे".