Join us  

प्रेक्षकांची निराशा करणारा ‘बँकचोर’!

By admin | Published: June 18, 2017 2:34 AM

‘धमाल’, ‘डबल धमाल’, ‘हाउसफुल्ल सीरिज’, ‘मस्ती’, ‘ग्रेट ग्रँड मस्ती’, ‘हमशकल्स’ हे चित्रपट बॉक्स आॅफिसवर फ्लॉप ठरले असले, तरीही रितेशची कॉमेडी

- जान्हवी सामंतहिंदी चित्रपट- ‘बँकचोर’!‘धमाल’, ‘डबल धमाल’, ‘हाउसफुल्ल सीरिज’, ‘मस्ती’, ‘ग्रेट ग्रँड मस्ती’, ‘हमशकल्स’ हे चित्रपट बॉक्स आॅफिसवर फ्लॉप ठरले असले, तरीही रितेशची कॉमेडी, त्याचा चित्रपटातील वावर प्रेक्षकांना हवाहवासा वाटायचा, पण हीच सहकलाकारांबरोबरची केमिस्ट्री त्याला ‘बँकचोर’मध्ये जमवता आली नाही. चोरी, दरोडा हे बॉलीवूडचे आवडीचे विषय. बॉक्स आॅफिसवर बक्कळ गल्ला जमवता येईल, या उद्देशाने अशा चित्रपटांची निर्मिती करायला दिग्दर्शक धजावतात. ‘धूम’, ‘स्पेशल २६’, ‘आँखे’, ‘हॅप्पी न्यू ईअर’ अशा अनेक चित्रपटांमध्ये पडद्यावरील चोरी प्रेक्षकांना अनुभवता आली, पण या चोरीसोबत कॉमेडीचा तडका देणारे चित्रपट फार कमी आहेत. ‘बँकचोर’ या चित्रपटाकडूनही प्रेक्षकांच्या तशाच अपेक्षा होत्या. मात्र, ‘बँकचोर’मुळे पे्रक्षकांची निराश होणार, हे मात्र नक्की. दिग्दर्शक हा चित्रपटाचा डिझायनर असतो. तो ज्याप्रमाणे कथानकाला वळण देईल, त्याप्रमाणे ते कथानक आकाराला येत असते. ‘बँकचोर’च्या बाबतीत ते इथेही ‘फोल’ ठरले. चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे नाव ‘बम्पी’ यावरूनच समजते की, साधारणपणे चित्रपटाचे कथानक, प्लॉट, थीम कशी असू शकेल? चित्रपटाच्या सुरुवातीच्या सीनवरूनच कळते की, दिग्दर्शक बम्पीने कथानकातही काहीच मेहनत घेतलेली नाहीये. चंपक चिपळूणकर (रितेश देशमुख) हा एक साधारण माणूस असतो. तो घरच्या जबाबदाऱ्या, अडचणी यांच्यामुळे अगोदरच खूप त्रस्त असतो. त्यातून मार्ग काढण्यासाठी मग तो बँकेत दरोडा टाकण्याचे ठरवतो. दिल्लीतले त्याचे दोन बदमाश दोस्त ‘गेंदा’ आणि ‘गुलाब’ यांना घेऊन तो ‘साउथ मुंबई बँक’मध्ये पोहोचतो. चित्रपटाच्या पहिल्याच सीनमध्ये चंपकचा प्लॅन आणि जोक्स फ्लॅट होतात. चित्रपटाच्या मध्यंतरादरम्यान, सीबीआय अजमद खान (विवेक ओबेरॉय) आणि गृहमंत्री डोंगरदिवे (उपेंद्र लिमये) हे मिळून चंपकच्या पाठीमागे लागतात. बँकेमधील स्टाफ, कस्टमर्स यांच्यामुळे चंपक, गेंदा आणि गुलाब यांच्या नाकी नऊ येतात. रितेश देशमुख म्हटल्यावर चित्रपट कॉमेडीने भरपूर असणार, अशी आशा पहिल्या एक -दोन सीन्समध्येच मावळते. प्लॉटमध्येच काही अर्थ नाही असे म्हटले, तरी अतिशयोक्ती होणार नाही. रितेश देशमुखकडून रसिकांना खूप अपेक्षा होती. मात्र, त्याला कथानकाचा सूरच गवसलेला नाहीये. ‘धमाल’, ‘डबल धमाल’, ‘हाउसफुल्ल सीरिज’, ‘मस्ती’, ‘ग्रेट ग्रँड मस्ती’, ‘हमशकल्स’ हे चित्रपट बॉक्स आॅफिसवर फ्लॉप ठरले असले, तरीही रितेशची कॉमेडी, त्याचा चित्रपटातील वावर प्रेक्षकांना हवाहवासा वाटायचा, पण हीच सहकलाकारांबरोबरची केमिस्ट्री त्याला ‘बँकचोर’मध्ये जमवता आली नाही. डायलॉग्ज आणि प्लॉट अगदीच मिळमिळीत असल्याने कलाकार तरी काय करणार? चित्रपटाच्या अखेरपर्यंत केवळ मुंबई-दिल्ली डायलॉग्जच सुरू असतात. उर्वरित चित्रपट हा केवळ ओव्हर अ‍ॅक्टिंग आणि बंदुकीच्या आवाजात सुरू राहातो. मध्यांतरापर्यंत प्रेक्षकांना कधीच खळखळून हसायला येत नाही, हेदेखील तेवढेच खरे. दुसऱ्या भागात तुम्हाला चित्रपट केव्हा संपतो? असे होऊन जाते. असा कॉमेडी चित्रपट बघण्यात काहीही अर्थ नाही, त्यामुळे चित्रपट न पाहिलेलाच बरा!