Join us  

आमिर खान तिसऱ्यांदा लग्न करण्याच्या तयारीत? म्हणाला, "मी ५९ वर्षांचा आहे, पण..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 9:53 AM

आमिर आणि किरण २०२१ मध्ये घटस्फोट घेत एकमेकांपासून वेगळे झाले. त्यानंतर आमिर तिसऱ्यांदा लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता खुद्द अभिनेत्याच याबाबत भाष्य करत खुलासा केला आहे. 

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान त्याच्या अभिनयातील करिअरबरोबरच पर्सनल आयुष्यामुळेही चर्चेत असतो. आमिर आणि त्याची दुसरी पत्नी किरण राव यांची जोडी बॉलिवूडमध्ये लोकप्रिय होती. सगळं काही सुरळीत सुरू असताना आमिर आणि किरण २०२१ मध्ये घटस्फोट घेत एकमेकांपासून वेगळे झाले. त्यानंतर आमिर तिसऱ्यांदा लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता खुद्द अभिनेत्याच याबाबत भाष्य करत खुलासा केला आहे. 

आमिरने नुकतीच रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टला हजेरी लावली होती. या पॉडकास्टमध्ये आमिरला त्याला पुन्हा लग्न करायचं आहे का? असा प्रश्न विचारला. या प्रश्नाचं उत्तर देताना आमिरने त्याच्या तिसऱ्यांदा बोहल्यावर चढण्याच्या चर्चांवर भाष्य केलं. आमिर म्हणाला, "मी आता ५९ वर्षांचा आहे. मला वाटत नाही की मी आता पुन्हा लग्न करू शकेन. मला हे कठीण वाटतंय. सध्या माझ्या आयुष्यात अनेक नाती आहेत. मी पुन्हा माझ्या कुटुंबीयांसोबत जोडलो गेलो आहे. मला मुलं आहेत. भाऊ-बहीण आहेत".  त्यावर रिया त्याला म्हणाली की, "जर मी जाहिरात दिली की आमिर खान नवरीच्या शोधात आहे?". रियाच्या या प्रश्नावर उत्तर देताना आमिर म्हणाला, "सध्या तरी नाही. मी माझ्या जवळच्या लोकांबरोबर आनंदी आहे. मी एक चांगला माणूस होण्याच्या दृष्टीने काम करत आहे". 

सध्या आमिर त्याच्या आगामी 'सितारे जमीन पर' सिनेमामुळे चर्चेत आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'तारे जमीन पर' या सिनेमाचा हा सीक्वल असणार आहे. या सिनेमात अभिनेत्री जिनिलीया देशमुख मुख्य भूमिकेत असणार आहे. डाऊन सिंड्रोमवर आधारित या सिनेमाची कथा असणार आहे. या सिनेमाची निर्मिती आमिर खान आणि किरण राव करत आहेत. तर आरएस प्रसन्ना या सिनेमाच्या दिग्दर्शनाची बाजू सांभाळत आहेत. 

टॅग्स :आमिर खानसेलिब्रिटी