Join us

Titu Ambani Movie Review : जाणून घ्या कसा आहे दीपिका सिंग आणि तुषार पांडे यांचा टीटू अंबानी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2022 11:20 AM

Titu Ambani Movie Review :अजमेरच्या पार्श्वभूमीवरील टीटू अंबानी या मध्यमवर्गीय कुटुंबातील एका तरुणाभोवती फिरणारी ही कथा आहे.

कलाकार : रघुवीर यादव, तुषार पांडे, दीपिका सिंग, विजेेंद्र काला, प्रीतम जयस्वालदिग्दर्शक : रोहित राज गोयलनिर्माता : महेंद्र विजयदान देठा, दिनेश कुमारशैली : कॉमेडी, कौटुंबिक, नाट्य.कालावधी : २ तासस्टार : दोन चित्रपट परीक्षण : संदीप आडनाईक

नोकरी सोडून स्टार्टअप बिझनेस करू इच्छिणारा टीटू आणि लग्नानंतरही आपल्या आईवडिलांना सांभाळून संसार करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मौसमीची ही एक कौटुंबिक कहाणी आहे. एका गैरसमजातून दोन तरुण मनाचा प्रवास यशस्वी होतो का, याचे चित्रण या चित्रपटात आहे. 

 कथानक : स्वत:चा स्टार्टअप बिझनेस सुरू करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबातील टीटू शुक्ला (तुषार पांडे)  हातची नोकरी  सोडतो आणि शॉर्टकटने व्यवसायातून पैसे कमावण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना लढवतो. कॅटरिंगपासून मिळेल तो व्यवसाय करणाऱ्या टीटूला कायम अपयशाला सामोरे जावे लागत असते. याउलट आईवडिलांची एकुलती एक मौसमी (दीपिका सिंग) टीटूच्या प्रेमात पडते. टीटूचे वडील (रघुवीर यादव) त्याचे लग्न करून दिले तर तो नंतर सुधारेल म्हणून प्रयत्न करतात; परंतु स्वत:च्या पायावर उभा नसलेला टीटू लग्न टाळत असतो. यावरून टीटू व मौसमीत भांडणं होत असतात. शेवटी साजन चतुर्वेदींच्या (विजेंद्र काला) मध्यस्थीने दोघांचे अखेर लग्न हाेते. पण नंतरही आपल्या पैशातून आईवडिलांना सांभाळणाऱ्या मौसमीच्या पैशावर जेव्हा टीटू दावा करतो, तेव्हा गोष्ट बिघडते. दोघांमधील गैरसमज दूर होतात का, टीटूचे स्वप्न पूर्ण  होते का, मौसमी काय भूमिका घेते हे प्रत्यक्ष पडद्यावर पाहणे मनोरंजक आहे. 

  लेखन-दिग्दर्शन : अजमेरच्या पार्श्वभूमीवरील टीटू अंबानी या मध्यमवर्गीय कुटुंबातील एका तरुणाभोवती फिरणारी ही कथा मांडण्याच्या प्रयत्नात दिग्दर्शक अनेकदा भरकटलेला आहे. कथानक दमदार असले तरी पटकथा कमकुवत आहे. याउलट विनोदाची पखरण करणारे वनलाइन संवाद खुशखुशीत आणि चपखल झाले आहेत. गाणीही बरी झाली आहेत. चित्रपट संथ असला तरी चांगला संदेश देतो, हीच काय ती जमेची बाजू. दोघांची राेमँटिक बाजू खटकते, त्यामुळे चित्रपटाशी प्रेक्षक जोडले जात नाहीत. 

 अभिनय : एनएसडीतून आलेले दिग्गज अभिनेते रघुवीर यादव, विजेंद्र काला यांनी सिनेमा तोलून धरण्याचा जबरदस्त प्रयत्न केला आहे. मात्र प्रामाणिकपणे काम केले असले तरी तुषार आणि दीपिका हे कलाकार छाप पाडण्यात यशस्वी होत नाहीत.

सकारात्मक बाजू : कथानक, खुशखुशीत संवाद, कॅमेरा, ध्वनी आणि अभिनय.नकारात्मक बाजू : दिग्दर्शन, पटकथा, काही प्रमाणात गाणी, कथानकात अडसर आणणारी दृश्ये.थोडक्यात : कथानक चांगले मात्र, पटकथा आणि दिग्दर्शन कमकुवत आहे. तरीही हा एकमेव कौटुंबिक चित्रपट थिएटरमध्ये पाहण्याचा अनुभव घेता येईल.

टॅग्स :सिनेमासेलिब्रिटी