Join us  

करिश्मा कपूरमुळे अक्षय खन्ना अद्यापही आहे अविवाहित; अभिनेत्रीच्या आईमुळे मोडलं ठरलेलं लग्न?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 7:37 PM

Akshaye Khanna: एकेकाळी अक्षय आणि करिश्मा कपूर यांच्या रिलेशनची कलाविश्वात प्रचंड चर्चा रंगली होती. इतकंच नाही तर ही जोडी लग्नदेखील करणार होती.

'हिमालय पुत्र' या चित्रपटाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण करणारा अभिनेता म्हणजे अक्षय खन्ना (Akshaye Khanna). एकेकाळी अक्षयचे अनेक चित्रपट गाजले. मात्र, कालांतराने त्याची क्रेझ कमी होऊ लागली. इतकंच नाही तर आता त्याचा कलाविश्वातील वावरही कमी झाला आहे. परंतु, अनेकदा त्याची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसून येते. अक्षय अद्यापही अविवाहित असून त्याच्या सिंगल राहण्यामागे अभिनेत्री करिश्मा कपूर (Karishma Kapoor) जबाबदार असल्याचं म्हटलं जातं. एका मुलाखतीत याविषयी त्याने भाष्यदेखील केलं होतं.

'बॉर्डर' या चित्रपटामुळे अक्षयला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. या चित्रपटानंतर त्याने अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्यात 'आ अब लौट चलें', 'ताल', 'दिल चाहता है', 'हलचल', 'गांधी माय फादर', 'हमराज' आणि 'हंगामा' यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. फिल्मी करिअरसोबतच अक्षयचं पर्सनल लाइफही चर्चेत राहिलं.  वयाची ४५ वर्ष पार केल्यानंतरही अक्षय अद्यापही अविवाहित आहेत. त्यामुळेच त्याने लग्न का केलं नाही असा प्रश्न नेटकऱ्यांना पडतो.

एकेकाळी अक्षय आणि करिश्मा कपूर यांच्या रिलेशनची कलाविश्वात प्रचंड चर्चा रंगली होती. इतकंच नाही तर ही जोडी लग्नदेखील करणार होती. मात्र, करिश्मा कपूरच्या आईमुळे हे लग्न होता होता राहिलं. त्यानंतर अक्षयने कोणत्याही मुलीसोबत पुन्हा लग्न करण्याचा विचार डोक्यातून काढून टाकला.

अक्षय आणि करिश्माचं लग्न व्हावं यासाठी अभिनेता रणधीर कपूर स्वत: विनोद खन्ना यांच्या घरी गेले होते. या दोघांनी आपल्या मुलांचं लग्नदेखील ठरवलं होतं. मात्र, या लग्नामुळे करिश्माची आई बबिता खूश नव्हती. त्यांनी या लग्नाला विरोध केला.

करिश्मा-अक्षयच्या लग्नाची बोलणी सुरु असताना त्याच काळात करिश्माच्या फिल्मी करिअरने चांगलाच जोर धरला होता. त्यामुळे लग्नामुळे आपल्या मुलीच्या करिअरवर परिणाम होऊ नये  यासाठी त्यांनी या लग्नाला विरोध केला. त्यामुळे हे लग्न होण्यापूर्वीच मोडलं.

दरम्यान, एका मुलाखतीमध्ये अक्षयने त्याच्या लग्नाविषयी भाष्य केलं होतं. कोणत्याही नात्यात मी फार काळ टिकू शकेन असं मला वाटत नाही. प्रत्येक नात्यात इतकं स्वातंत्र्य हवं की मनात येईल त्यावेळी तुम्ही दुसरं नवं नातं जोडू शकता. परंतु, लग्नानंतर असं होत नाही. आणखी एक गोष्ट मला मुलं अजिबात आवडत नाहीत. त्यामुळे लग्न न करण्यामागे हेदेखील एक कारण आहे. आणि, आता मी लग्न करणार सुद्धा नाही. मला एकटं राहायची सवय आणि आवड निर्माण झाली आहे, असं अक्षय म्हणाला होता. 

टॅग्स :करिश्मा कपूरसेलिब्रिटीसिनेमाबॉलिवूड