Join us

Amitabh Bachchan Birthday: बाळासाहेबांमुळे वाचले होते बिग बींचे प्राण, भर पावसात आली होती शिवसेनेची अ‍ॅम्ब्युलन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 11:20 AM

अमिताभ बच्चन यांचा १९८३ साली प्रदर्शित झालेला 'कुली' हा  सिनेमा प्रचंड गाजला. पण या सिनेमाच्या वेळी अमिताभ बच्चन यांना गंभीर दुखापत झाली होती. तेव्हा जीवनमरणाच्या दारात असलेल्या अमिताभ बच्चन यांच्या मदतीसाठी बाळासाहेब ठाकरे धावून आले आणि त्याचे प्राण वाचले.

बिग बी अमिताभ बच्चन गेली कित्येक वर्ष अभिनयाने प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहेत. त्यांच्या अभिनय कारकीर्दित एक सो एक हिट सिनेमे त्यांनी बॉलिवूडला दिले. अमिताभ बच्चन यांचा १९८३ साली प्रदर्शित झालेला 'कुली' हा  सिनेमा प्रचंड गाजला. पण या सिनेमाच्या वेळी अमिताभ बच्चन यांना गंभीर दुखापत झाली होती. तेव्हा जीवनमरणाच्या दारात असलेल्या अमिताभ बच्चन यांच्या मदतीसाठी बाळासाहेब ठाकरे धावून आले आणि त्याचे प्राण वाचले. आज त्यांच्या वाढदिवशी बिग बींचा हा किस्सा जाणून घेऊया. 

'कुली' सिनेमात अ‍ॅक्शन सीन्स शूट करताना अमिताभ बच्चन यांना गंभीर दुखापत झाली होती. फायटिंग सीक्वेन्स करताना त्यांच्या पोटात जबर मार बसला होता. अमिताभ यांना लगेचच बँगलोरमधील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि त्यांच्यावर सर्जरी करण्यात आली. तेव्हा ते ICU मध्ये होते. बिग बींच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी जया बच्चन यांनी पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला नवसही केला होता. बिग बींचे चाहतेही त्यांच्यासाठी प्रार्थना करत होते. 

परंतु, तरीदेखील अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीत काहीच सुधारणा नव्हती. त्यामुळे बिग बींना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलला हलवण्याचा निर्णय घेतला गेला. बँगलोरवरुन त्यांना फ्लाइटने मुंबईत आणलं गेलं. एअरपोर्टवरुन त्यांना अ‍ॅम्बुलन्सने लगेचच हॉस्टिपटलला न्यायचं होतं. पण, तेव्हाच मुंबईत मुसळधार पाऊस सुरू होता. आणि त्यामुळे एअरपोर्टवर कोणतीही अ‍ॅम्ब्युलन्स येऊ शकत नव्हती. बाळासाहेब ठाकरेंना ही गोष्ट कळताच त्यांनी शिवसेनेची अ‍ॅम्बुलन्सची पाठवली. त्या अ‍ॅम्बुलन्सने बिग बींना ब्रीच कँडी रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं आणि त्यांचे प्राण वाचले.

अमिताभ बच्चन यांनी स्वत: एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता. शिवसेनेची अॅम्बुलन्स पाठवल्यामुळे त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे आभारही मानले होते.  "जर तेव्हा बाळासाहेबांच्या शिवसेनेची अ‍ॅम्बुलन्स आली नसती तर काय झालं असतं मला माहीत नाही", असं बिग बी म्हणाले होते. 

टॅग्स :अमिताभ बच्चनबाळासाहेब ठाकरेशिवसेना