Join us  

"मी अमृता सुभाषला सिनेमातून काढलं कारण...", अनुराग कश्यपचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 12:41 PM

बॉलिवूडचे लोकप्रिय दिग्दर्शक अनुराग कश्यपने अमृताला एका सिनेमातून तडकाफडकी का काढून टाकलं याविषयी खुलासा केलाय (anurag kashyap, amruta subhash)

बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक म्हणजे अनुराग कश्यप. 'ब्लॅक फ्रायडे', 'गँग्ज ऑफ वासेपूर', 'मनमर्जिया', 'रमन राघव' असे वेगळ्या धाटणीचे सिनेमे अनुराग कश्यपने दिग्दर्शित केले. अनुराग कश्यपसोबत मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाषने सुद्धा काम केलंय. 'रमन राघव', 'सेक्रेड गेम्स' अशा अनुरागच्या कलाकृतींमध्ये अमृताने अभिनय केला. पण एका सिनेमाच्या शूटींगआधी मात्र अनुरागने तडकाफडकी अमृताला काढून टाकलं. नेमकं काय घडलं होतं याचा खुलासा स्वतः अनुरागने केलाय. 

अमृताला अनुरागने सिनेमातून का काढलं?

अनुराग लवकरच 'बॅड कॉप' या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमाच्या एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये अनुराग कश्यपने याविषयी खुलासा केला. अनुराग आणि अमृता आजवर तीनवेळी एकत्र काम केलंय. एका नव्या सिनेमाची ऑफर अनुरागने अमृताला दिली. अमृताच्या साध्या स्वभावाचा अनुभव अनुरागला होता. नव्या सिनेमासाठी अमृताला कास्ट करताना तिच्या मॅनेजरने अनुरागला एकदा फोन आला. मॅनेजरने अमृतासाठी सिंगल डोअर व्हॅनिटी आणि इतरही अनेक मागण्या केल्या. हे ऐकल्यानंतर 'वेड लागलंय का?' असं अनुरागच्या मनात आलं. त्याने थेट मॅनेजरला फोन करुन अमृताला सिनेमातून काढण्याचा निर्णय कळवला. 

अमृताला हे कळल्यावर ती काय म्हणाली?

हे घडल्यानंतर अमृता सुभाषला तिला सिनेमातून अनुरागने काढलं असल्याचं कळलं. तिने अनुरागला फोन लावून तिच्याकडून 'काही चूक झाली का?' असं विचारलं. तेव्हा अनुरागने तिच्या मॅनेजरने केलेल्या मागण्या सांगितल्या. अमृताला तिच्या मागे मॅनेजर काय बोलला याची काही कल्पना नव्हती. अमृताला घडलेला प्रकार कळताच तिने मॅनेजरला चांगलंच झापलं. माझ्या नावावर मला कोणतीही कल्पना न देता तू अशा मागण्या कशा मागू शकतोस, असं म्हणत तिने मॅनेजरला फैलावर घेतलं.

 

टॅग्स :अनुराग कश्यपबॉलिवूडमराठी