Join us

बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर अरबाज खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "कुटुंबात खूप काही..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 5:12 PM

सलमानच्या सुरक्षेविषयी अरबाज खान म्हणाला...

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान (Salman Khan) सध्या दहशतीखाली आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या गँगच्या तो निशाण्यावर आहे. त्यातूनच नुकतीच सलमानचे जवळचे मित्र आणि राजकारणी बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्याचं बोललं जात आहे. यानंतर सलमानची सुरक्षा आणखी वाढवण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर भर गर्दीत गोळीबार झाला ज्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अंत्यदर्शनाला सलमानही पोहोचला होता. सलमानला मारता येत नसल्याने त्याच्या जवळच्यांना लक्ष्य केलं जात असल्याची सध्या चर्चा सुरु आहे. दरम्यान नुकतंच अरबाज खानने (Arbaaz Khan) अशा परिस्थितीत कुटुंबात नेमकं कसं वातावरण आहे याचा खुलासा केला.

अरबाज खान सध्या आगामी 'बंदा सिंह चौधरी' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्याने सिनेमाची निर्मिती केली असून अर्शद वारसी यामध्ये मुख्य भूमिकेत आहे. 'झूम'ला दिलेल्या मुलाखतीत अरबाजला सध्या खान कुटुंबातील माहोलविषयी विचारण्यात आलं. यावर तो म्हणाला,"आम्ही ठीक आहोत. पण पूर्ण ठीक आहोत असं तर म्हणता येणार नाही. सध्या कुटुंबात बरंच काही सुरु आहे. प्रत्येक जण त्रासलेला आहे. आम्ही एकमेकांची काळजी घेत आहोत. सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करत आहोत. सलमान खानही सुरक्षित राहील याची खबरदारी घेतली जात आहे. पोलिस, सुरक्षाकर्मी प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. पण सध्या मी या सगळ्यातून सिनेमावर लक्ष देत आहे आणि प्रमोशन करत आहे."

सलमान खान सध्या बिग बॉस १८ चं शूट करत आहे. तसंच तो आगामी 'सिकंदर' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान त्याची सुरक्षा आणखी वाढवण्यात आली आहे. बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगनेच उचलली असल्याने सलमानची चिंता आणखी वाढली आहे.

टॅग्स :अरबाज खानसलमान खानबाबा सिद्दिकीबॉलिवूड