Join us

प्रभास व सामंथा रूथ प्रभुने आजपर्यंत का केले नाही एकत्र काम? कारण वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 5:09 PM

आज सामंथा तिचा 33 वा वाढदिवस साजरा करतेय.

ठळक मुद्देसामंथाचा जन्म २८ एप्रिल १९८७ ला चेन्नईत झाला. ती ही एक प्रसिद्ध अभिनेत्री, मॉडेल आहे.

‘बाहुबली’ प्रभासची लोकप्रियता आधीपासूनच होती. मात्र ‘बाहुबली’ नंतर प्रभास रातोरात सुपरस्टार बनला. देशासह जगभरात प्रभासची लोकप्रियता सर्वोच्च शिखरावर पोहोचली. आज प्रभास चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे. प्रभासने आत्तापर्यंत साऊथच्या अनेक अभिनेत्रींसोबत काम केले. अनुष्का शेट्टी, नयनतारा, तमन्ना, त्रिशा अशी ही यादी बरीच मोठी आहे. पण साऊथच्या एका आघाडीच्या अभिनेत्रीसोबत मात्र प्रभास अद्याप एकही सिनेमा केलेला नाही. ही अभिनेत्री कोण तर सामंथा रूथ प्रभु. सामंथा व प्रभास ही जोडी अद्याप एकाही चित्रपटात एकत्र झळकलेली नाही. आता असे का तर यामागे एक विचित्र कारण आहे. होय, हे कारण ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

आज सामंथा तिचा 33 वा वाढदिवस साजरा करतेय. त्यामुळेच आज आम्ही या कारणाचा खुलासा करणार आहोत. अलीकडे एका मुलाखतीत खुद्द प्रभासने हा खुलासा केला होता. तू सामंथासोबत अद्याप एकही चित्रपट केलेला नाही, यामागे काही विशेष कारण आहे का? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. यावर प्रभासने दिलेले उत्तर ऐकून सगळेच अवाक् झाले होते. होय, यामागचे उंची हे एकमेव कारण असल्याचे प्रभास म्हणाला होता. सामंथा व मी एकत्र काम न करण्याचे एकच कारण आहे ते म्हणजे हाईट डिफरन्स, असे प्रभासने सांगितले होते.

 तुम्हाला ठाऊक असेलच की सामंथा ही सुपरस्टार नागार्जुनची सून आहे. 2017 मध्ये नागर्जुनचा मुलगा नागा चैतन्य आणि अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूचे लग्न झाले. या लग्नाची प्रचंड चर्चा मीडियामध्ये रंगली होती. तब्बल दहा कोटी रुपये खर्च आलेल्या या सोहळ्याची बातच न्यारी होती. हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही धार्मिक पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला होता़ नवदाम्पत्याचा लूक, राजेशाही थाटातील सोहळा, दागदागिने आणि दिग्गजांची उपस्थिती यामुळे हा सोहळा त्या वर्षभरातील सगळ्यात मोठा सेलिब्रिटी लग्नसोहळा ठरला होता.

 सामंथाचा जन्म २८ एप्रिल १९८७ ला चेन्नईत झाला. ती ही एक प्रसिद्ध अभिनेत्री, मॉडेल आहे. दक्षिणेतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना केली जाते. ती कॉलेजमध्ये असताना प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शक रवी वर्मन यांची तिच्यावर नजर पडली आणि त्यांनी तिला ‘मास्कोविन कावेरी’ या चित्रपटाची आॅफर दिली आणि तिचे संपूर्ण आयुष्यच बदलले. सामंथा ही एका सामान्य कुटुंबातील आहे. त्यामुळे तिने चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी अनेक छोट्या-मोठ्या नोक-या केल्या आहेत. आज ती कोट्यावधीची मालकीण आहे.

टॅग्स :समांथा अक्कीनेनीप्रभास