Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतचा (Kangana Ranaut) बहुप्रतीक्षित सिनेमा 'इमर्जन्सी' हा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सध्या सर्वत्र या सिनेमाची चर्चा होताना दिसतेय. 'इमर्जन्सी'मधील काही दृश्यांवर आक्षेप घेतल्यामुळे हा सिनेमा प्रदर्शित होण्यास विलंब झाला होता. १९७५ साली माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीवर सदर चित्रपट आधारित आहे. त्यानंतर अखेर सेन्सॉर बोर्डकडून सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा करण्यात आला. असं असतानाही पंजाबमध्ये इमर्जन्सीच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, अभिनेत्रीने चित्रपटाला मिळणारं प्रेम आणि चाहत्यांकडून होणारं कौतुक पाहून भारावली आहे. नुकताच सोशल मीडियावर तिने चाहत्यांचे आभार मानत खास व्हिडीओ शेअर केला आहे.
आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर कंगना राणौतने व्हिडीओ पोस्ट करत निराशा देखील दर्शवली आहे. दरम्यान, अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये म्हटलंय, "मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते, तुम्ही या सिनेमाला खूप प्रेम दिलं. त्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीयेत. पण, मला अजूनही एका गोष्टीबद्दल खंत वाटते."
पुढे अभिनेत्री म्हणाली, "इंडस्ट्रीत असं म्हटलं जातं की पंजाबमध्ये माझे सिनेमे चांगले चालतात आणि आज असा दिवस पाहावा लागतोय जिथे माझा सिनेमा रिलीज सुद्धा होऊ दिला जात नाहीये. माझे सिनेमे, माझे विचार, देशाप्रती असलेलं प्रेम दर्शवतात. तुम्हीच हा चित्रपट पाहूनच ठरवा की ही फिल्म आपल्याला जोडणारी आहे की तोडणारी आहे. तुम्ही हा सिनेमा पाहा आणि स्वत: निर्णय घ्या."
कंगना रणौतचा 'इमर्जन्सी' हा चित्रपट १७ जानेवारी २०२५ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता श्रेयस तळपदे, महिमा चौधरी, मिलिंद सोमण आणि सतीश कौशिक यांसारखे कलाकार देखील पाहायला मिळत आहेत.