Join us

राणी मुखर्जी- ऐश्वर्या राय यांच्या मैत्रीत 'या' कारणामुळे पडली होती फूट; अबोला अजूनही कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 10:21 AM

बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी आणि ऐश्वर्या राय या दोघी जिवलग मैत्रीणी होत्या.

Rani Mukerji and Aishwarya Rai Friendship : बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी (Rani Mukerji) आणि ऐश्वर्या राय(Aishwarya Rai) या दोघी एकमेकींच्या जिवलग मैत्रीणी होत्या. परंतु काही वैयक्तिक मतभेदांमुळे त्यांच्या मैत्रीत फूट पडली, असं सांगण्यात येतं. 

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार सापडतील ज्यांच्या मैत्रीचे किस्से आजही प्रसिद्ध आहेत. पण, या अभिनयाची चंदेरी दुनियेत आजही असे कलाकार आहेत जे एकेकाळी एकमेंकांचे चांगले मित्र होते पण काही कारणामुळे त्यांच्या नात्यात दुरावा आला. त्यातील एक उदाहरण म्हणजे राणी मुखर्जी आणि ऐश्वर्या राय यांचं आहे. 

९०च्या दशकातील आघाडीच्या नायिका म्हणजे अभिनेत्री राणी मुखर्जी आणि ऐश्वर्या राय. वेगवेगळ्या हिंदी चित्रपटांमध्ये काम करून त्यांनी आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं. त्या दरम्यान, या अभिनेत्रींमध्ये घट्ट मैत्रीचं नातं निर्माण झालं होतं. पण, काही कारणामुंळे त्यांच्या नात्यात वादाची ठिणगी पडली. जवळपास २१ वर्षे उलटूनही या मैत्रीणींमधला अबोला अजून कायम आहे.

राणी मुखर्जी- ऐश्वर्या राय यांच्या मैत्रीत का पडली फूट?

असं सांगितलं जातं की, 'चलते-चलते' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांच्यामध्ये काहीतरी बिनसलं होतं. अशातच एका दिवशी सलमानमुळे या चित्रपटाच्या सेटवर वाद निर्माण झाला होता. या घटनेनंतर ऐश्वर्या रायला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. सलमान खानच्या हरकतींना  सगळेच वैतागले होते तेव्हा निर्मात्यांनी हा निर्णय घेतला होता. त्यामुळे ऐश्वर्याला रिप्लेस करून त्याजागी अभिनेत्री राणी मुखर्जीला कास्ट करण्यात आलं. 

अचानक चित्रपटातून बाहेर काढल्यानंतर या गोष्टीचा ऐश्वर्याला धक्का बसला. पण, ऐश्वर्या रायला सर्वात जास्त तेव्हा  वाईट वाटलं जेव्हा राणी मुखर्जी चित्रपटात काम करणार असल्याची गोष्ट तिला समजली होती. कारण राणी मुखर्जी आणि तिची फार घट्ट मैत्री होती. या कारणामुळे ऐश्वर्या तिच्या मैत्रीणीवर नाराज झाली आणि त्यामुळे या दोघींच्या नात्यात फूट पडली.

शिवाय करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये राणी मुखर्जीने करीना कपूरसोबत हजेरी लावली होती. त्यावेळी अभिनेत्रीने मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. त्यादरम्यान राणी मुखर्जीला ऐश्वर्या आणि तिच्या मैत्रीबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा अभिनेत्री करण जोहरला म्हणाली, "तुम्हाला यामागील कारण माहित आहे. मला काहीच अडचण नाही, शिवाय मला आजही ती खूप आवडते. तिच्यासोबत माझं काही वैयक्तिक वैर नाही. ऐश्वर्यालाही काही अडचण असेल असं मला वाटत नाही. भलेही तिने फोनवर बोलणं बंद केलंय आणि आमचं कुठेही भेटणंही झालं नाही. पण मला वाटतं जेव्हा आम्ही भेटू तेव्हा आमच्यामध्ये सगळं काही ठीक असेल".

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनराणी मुखर्जीबॉलिवूडसेलिब्रिटी