Veer Zara Movie: शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि प्रिती झिंटा (Preity Zinta) स्टारर 'वीर झारा' या चित्रपटाचा एक वेगळाच फॅनबेस आहे. आज इतकी वर्षे उलटूनही 'वीर झारा'ची क्रेझ काही कमी झालेली नाही. आता 'वीर झारा' २० वर्षांनंतर पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात येणार आहे. दिग्दर्शक यश चोप्रा यांचा जागतिक ब्लॉकबस्टर 'वीर झारा' ७ नोव्हेंबरपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर ६०० स्क्रीन्सवर पुन्हा रिलीज करण्यात आला आहे. त्यामुळे सिनेरसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटात प्रिता झिंटा आणि राणी मुखर्जीने केलेल्या अभिनचं सर्वत्र कौतुक झालं, शिवाय मनोज वाजपेयी देखील मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले. पण, 'वीर झारा'मध्ये 'झारा'च्या भूमिकेसाठी प्रिती झिंटा दिग्दर्शकाची पहिली पसंत नव्हती.
'वीर झारा' हा चित्रपट २००४ मध्ये जगभरात प्रदर्शित करण्यात आला. बॉक्सऑफिसवर चित्रपटाने कमाईचे अनेक विक्रम रचले. या चित्रपटात भारतीय हवाई दलाचा पायलट वीर प्रताप सिंग (शाहरुख खान) आणि पाकिस्तानी महिला झारा हयात खान (प्रीती झिंटा) यांची अमर प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. परंतु त्यावेळी इंडस्ट्रीत शाहरुख आणि ऐश्वर्या रायची जोडी सुपरहिट होती. त्या दोघांनी तेव्हा बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. या जोडीला प्रेक्षकांचीही पसंती होती. परंतु 'वीर झारा'मध्ये ऐश्वर्याला रिप्लेस करून प्रिती झिंटाला कास्ट करण्यात आलं.
याचा खुलासा ऐश्वर्याने सीमी ग्रेवाल यांच्या शोमध्ये केला होता. त्यावेळी अभिनेत्री ऐश्वर्या रायला तब्बल ५ चित्रपटांमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता, असंही तिने सांगितलं. तेव्हा ऐश्वर्या म्हणाली, "मी 'वीर झारा'सह जवळपास ५ प्रोजेक्ट्समध्ये काम करत होते. त्यानंतरच अचानक मला समजलं की मला चित्रपटातून बाहेर काढण्यात आलं आहे. असं काही घडलं तर त्याचा प्रचंड त्रास होतो. मी कधीही शाहरुखसोबत काम करण्यास नकार दिला नाही". असा खुलासा तिने केला होता.
खरंतर, 'वीर झारा' चित्रपटाच्या दरम्यान बॉलिवूडमध्ये ऐश्वर्या राय आणि सलमान खानच्या अफेयरची जोरदार चर्चा होती. त्यावेळी सलमानमुळे ऐश्वर्या काम करत असलेल्या ठिकाणी वाद निर्माण झाले होते. याचं कारण सलमान- ऐश्वर्यामधील ब्रेकअप असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे ऐश्वर्याला या चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.