Join us  

उद्धव ठाकरे अन् राऊत यांची अवस्था पाहून कसं वाटतंय ? नेटकऱ्याच्या प्रश्नावर कंगना म्हणाली, 'कर्माची फळं...'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 3:23 PM

सध्याच्या राजकीय वादावर बॉलिवूडच्या 'क्वीन' ने प्रतिक्रिया दिली आहे.

Knagana Ranaut : केंद्रीय निवडणूक आयोगाने 'शिवसेना' हे नाव आणि 'धनुष्यबाण' हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. या धक्कादायक निकालानंतर उद्धव ठाकरेंचे समर्थक आक्रमक झाले आहेत. आता या निर्णयावर खुद्द बॉलिवूडच्या क्वीननेच प्रतिक्रिया दिली आहे. कंगना सध्या ट्विटरवर askkangana या माध्यमातून चाहत्यांच्या/नेटकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरं देत आहे. दरम्यान उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची झालेली अवस्था यावर कंगनानं संमिश्र स्वरुपाची प्रतिक्रिया दिली आहे.

शाहरुख खानच्या asksrk प्रमाणेच आता कंगना देखील ट्विटरवर askkangana च्या माध्यमातून चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं देत आहे. चाहत्यांशी संवाद साधत आहे. तेव्हाच एका युझरने प्रश्न विचारला की, 'उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची अवस्था बघून कसं वाटत आहे? '

युझरच्या या प्रश्नावर कंगनाने अगदी संयमी आणि संमिश्र प्रतिक्रिया दिली आहे. कंगना म्हणते, 'इतरांचे नशिब पाहून एखाद्याला कधीही दोषी वाटू नये, नीच, दयनीय लोकांना असे वाटते, मी तशी व्यक्ती नाही. त्यांना त्यांच्या कर्माची फळं मिळत आहेत. माझ्या भावना बाजूला मी गोष्टींचे निरीक्षण आणि चिंतन करते.'

कंगनाच्या या उत्तराने तिने युझर्सचे मनच जिंकले आहे. 'म्हणूनच तू क्वीन आहेस' अशी कमेंट एका युझरने केली आहे.

२०२० मध्ये कोरोना काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार आणि कंगना राणावत यांच्यातील वाद चांगलाच तापला होता. हा वाद इतका विकोपाला गेला की कंगनाचं पाली हिल येथील ऑफिस अवैध आहे असं दाखवत बीएमसीकडून ते तोडण्यात आलं. 'आज मेरा घर टूटा है कल तेरा घमंड टूटेगा' असं उत्तर तिने उद्धव ठाकरेंना दिलं होतं. तर दुसरीकडे संजय राऊत यांनीही अनेकदा कंगनावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. आता उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर आलेल्या या परिस्थितीवर कंगनाने मात्र संयमी प्रतिक्रिया दिली आहे.

टॅग्स :कंगना राणौतमहाराष्ट्र सरकारउद्धव ठाकरेसंजय राऊत