Join us  

Kantara Box Office Collection: ‘कांतारा’ची जादू चालली, हिंदी व्हर्जनने दोन दिवसांत कमावले इतके कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2022 1:32 PM

Kantara Box Office Collection: आयएमडीबीवर ‘कांतारा’ला 10 पैकी 9.6 रेटींग मिळालं आहे आणि बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने छप्परफाड कमाई केली आहे.

Kantara Box Office Collection: सध्या चित्रपटगृहांमध्ये अनेक चित्रपटांची गर्दी आहे. गेल्या शुक्रवारी परिणीती चोप्रा आणि हार्डी संधूचा ‘कोड नेम तिरंगा’ रिलीज झाला. याशिवाय आयुष्यमान खुराणाचा ‘डॉक्टर जी’सुद्धा धडकला. याशिवाय गॉडफादर, पोन्नियन सेल्वन, विक्रम वेधा, गुडबाय आणि कांतारा हे सिनेमेही आहेत. या सगळ्यांमध्ये ‘कांतारा’ने ( Kantara ) बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. अभिनेता ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा’ 30 सप्टेंबरला कन्नड आणि मल्याळमध्ये प्रदर्शित झाला तर 14 ऑक्टोबरला हिंदीत रिलीज झाला. आयएमडीबीवर ‘कांतारा’ला 10 पैकी 9.6 रेटींग मिळालं आहे आणि बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने छप्परफाड कमाई केली आहे.

कन्नडमध्ये या चित्रपटाने वर्ल्डवाईड 100 कोटींचा आकडा पार केला आहे. चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद बघता, गेल्या शुक्रवारी हा सिनेमा हिंदीत रिलीज झाला. हिंदी व्हर्जनने रिलीजच्या पहिल्या दिवशी 1.27 कोटींची कमाई केली आणि दुसºया दिवशी म्हणजे काल शनिवारी सुमारे 2.35 कोटींचा गल्ला जमवला. 1300 स्क्रिन्सपेक्षा कमी ठिकाणी रिलीज होऊनही ‘कांतारा’ने चांगली सुरूवात केली आणि  दोन दिवसांत एकूण 3.62 कोटींचा बिझनेस केला. येत्या दिवसांत हा सिनेमा शानदार कमाई करू शकतो, असा विश्वास जाणकारांनी व्यक्त केला आहे.

‘कांतारा’ची कथा ऋषभ शेट्टीनं लिहिली आहे. तोच या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे आणि त्याने या चित्रपटात लीड रोल साकारला आहे. ‘कांतारा’च्या कथेने आणि दृश्यांनी लोकांना चांगलंच आकर्षित केलं आहे. सोशल मीडियावरही ‘कांतारा’ ट्रेंड करतोय. फक्त 16 कोटी रूपयांत बनलेल्या या सिनेमाने बजेट कधीच वसूल केला आहे. मर्यादीत स्क्रिन्सवर रिलीज होऊनही ‘कांतारा’ शानदार कमाई करताना दिसतेय.

‘कांतारा’ची कथाएक राजाने देव मानल्या जाणाऱ्या एका दगडाच्या बदल्यात आपली काही जमीन गावकऱ्यांना दिली होती. आता अनेक वर्षानंतर त्या राजाची पिढी ही जमीन वापस घेऊ इच्छिते.  जमीन देण्याचा शब्द फिरवला तर अनर्थ घडेल, हे देवतेने राजाला आधीच बजावलं असतं. अशात राजाचे वंशज राजाने दिलेली जमीन परत घेऊ इच्छितात, दुसरीकडे एक फॉरेस्ट ऑफिसर गावकऱ्यांच्या विरोधात उभा राहतो. गावकरी जंगलाला नुकसान पोहोचवत असल्याचं त्याचं म्हणणं असतं. पण गावकऱ्यांच्या मते, ते जंगलाचे सेवेकरी आहेत आणि जंगलावर त्यांचा अधिकार आहे. या सगळ्या गुंत्यामुळे देवता नाराज होते. पुढे काय घडतं, तीच या चित्रपटाची कथा आहे. ही कथा साऊथ इंडियाच्या तुलू नाडू कल्चरशी संबंधित आहे.   कथेत शिवा नावाचा एक हिरो आहे. त्याच्याभोवती चित्रपटाची कथा फिरताना दिसते.

टॅग्स :Tollywoodसिनेमा