Join us  

'हीरामंडी' पाहिल्यानंतर मनिषाला फोन केला का? नाना पाटेकर म्हणाले, 'तिचा नंबर...'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 1:17 PM

मनिषा कोईराला आणि नाना पाटेकर यांचं एकेकाळी अफेअर होतं.

नाना पाटेकर (Nana Patekar) म्हणजे हिंदी, मराठी सिनेसृष्टीतील अतिशय प्रतिभावान अभिनेते आहेत. त्यांचा अभिनय प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा असतो. अनेक वर्षांपासून ते सिनेसृष्टीत काम करत आहेत. नाना पाटेकर यांच्या करिअरच्या काळात त्यांचं आणि अभिनेत्री मनिषा कोईरालाचं (Manisha Koirala) अफेअर चर्चेत होतं. तेव्हा नाना विवाहित होते आणि त्यांना पत्नीला घटस्फोट द्यायचा नव्हता. त्यामुळे दोघांचं नातं तुटलं. यानंतर नाना आणि मनिषा कधीच समोरासमोर आले नाहीत. नुकतंच नानांनी एका मुलाखतीत मनिषा कोईरालाच्या 'हीरामंडी' वेबसीरिजवर प्रतिक्रिया दिली. 

'द लल्लनटॉप'ला दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकरांनी अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली. त्यांच्यासमोर काही कलाकारांची नावं घेतली गेली आणि त्या कलाकाराबाबतीत त्यांना काय वाटतं हे व्यक्त करण्यास सांगितलं. जेव्हा मनिषा कोराईलाचं नाव घेण्यात आलं तेव्हा नाना म्हणाले,"महान अभिनेत्री. दुर्भाग्याने तिने खूप कमी वयात कॅन्सरसारख्या आजाराचा सामना केला याचं मला दु:ख आहे. मी नुकतीच तिची हीरामंडी वेबसीरिज बघितली. यात तिने अप्रतिम काम केलं आहे."

नाना पाटेकरांनी 'हीरामंडी'चा उल्लेख केल्यानंतर त्यांना पुढे विचारण्यात आलं की मनिषाला त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी फोन केला का? यावर नाना म्हणाले, 'नाही. मला वाटतं तिचा नंबर आता बदलला असेल.'

1996 साली नाना पाटेकर आणि मनिषा कोईरालाने 'खामोशी' सिनेमात एकत्र काम केलं होतं. तेव्हा त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. दोघांना अनेकदा सोबतही पाहिलं गेलं. त्याच वर्षी दोघांचा 'खामोशी' सिनेमाही आला होता. हा म्युझिकल ड्रामा होता जो सुपरहिट झाला. सलमान खान आणि मनिषाची यामध्ये जोडी होती. तर नाना पाटेकरांनी मनिषाच्या वडिलांची भूमिका केली होती. 

टॅग्स :नाना पाटेकरमनिषा कोईरालारिलेशनशिपबॉलिवूड