Join us  

बांगलादेशात अल्पसंख्याकांवरील हिंसाचार पाहून दुखावली प्रिती झिंटा, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 9:30 AM

बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या हिंसाचारावर अभिनेत्री प्रिती झिंटाने प्रतिक्रिया दिली.

बांगलादेशात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू असून शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत देश सोडल्याने अनागोंदी सुरू आहे. आता प्रोफेसर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वात अंतरिम सरकार स्थापन झालं आहे. या संपुर्ण परिस्थितीमध्ये बांगलादेशात अल्पसंख्याक धोक्यात आले आहेत. यावर आता अभिनेत्री प्रीती झिंटाने सोशल मीडियावर आपले मत मांडले आहे.

प्रीती झिंटाने ट्विटमध्ये लिहिले की, 'बांगलादेशातील अल्पसंख्याक लोकसंख्येवरील हिंसाचाराच्या बातम्या ऐकून मन दुखी झाले. लोक मारले गेले, कुटुंबांना त्यांच्या घरातून पळून जाण्यास भाग पाडले गेले, महिलांवर अत्याचार केले गेले आणि अनेक प्रार्थनास्थळांची तोडफोड, जाळपोळ करण्यात आली. नवीन सरकार हिंसाचार थांबवण्यासाठी आणि लोकांचे संरक्षण करण्यासाठी योग्य पावले उचलेल अशी आशा आहे. अडचणीचा सामना करणाऱ्या सर्वांसाठी माझ्या संवेदना आणि प्रार्थना आहेत'.

बांगलादेशातील हल्ल्याचा निषेध करणारी प्रीती झिंटा ही पहिली भारतीय अभिनेत्री नाही. यापूर्वी सोनू सूद आणि रवीना टंडननेही बांगलादेशातील हिंसाचारावर प्रतिक्रिया दिली होती. आता सध्या बांगलादेशात जे 'काळजीवाहू सरकार' स्थापन झाले आहे. या सरकारमधील सुप्रदीप चकमा हे एकमेव नाव अल्पसंख्याकांना दिलासा देणारे आहे. सुप्रदीप चकमा हे मुत्सद्दी आणि माजी राजदूत आहेत, तर ग्रामीण बँक आणि बँक ऑफ बांगलादेशमधील अनुभवी अर्थकारणी, लष्करी तज्ज्ञ यांबरोबरच मानवी हक्क कार्यकर्त्यांचा समावेशही या सरकारमध्ये आहे.

टॅग्स :प्रीती झिंटाबांगलादेश