Join us

विवेक ओबेरॉय नाही तर करिश्मामुळे झाला ऐश्वर्या-सलमानचा ब्रेकअप? नेमकं काय घडलं होतं तेव्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 4:45 PM

Karisma kapoor: सलमान-ऐश्वर्याच्या नात्यात करिश्मा ठरली व्हिलन? जाणून घ्या, नेमकं काय आहे प्रकरण

बॉलिवूडमध्ये आजवर अनेक कलाकारांचे ब्रेकअप-पॅचअप झाले आहेत. मात्र, या सगळ्यांमध्ये ऐश्वर्या राय (aishwarya rai) आणि सलमान खान (salman khan)यांचा ब्रेकअप चांगलाच गाजला. आजही या दोघांच्या नात्याविषयी अनेक चर्चा रंगतात. अनेक मुलाखतींमध्ये ऐश्वर्यानेही अप्रत्यक्षपणे सलमानवर काही आरोपप्रत्यारोप केले आहेत. तर, सलमाननेही नाव न घेता या ब्रेकअपवर भाष्य केलं आहे. परंतु, या दोघांचा ब्रेकअप नेमका कशामुळे किंवा कोणामुळे झाला यामागचं खरं कारण कोणालाही ठावूक नाही. यातच आता अभिनेत्री करिश्मा कपूरमुळे(karishma kapoor) ऐश-सलमानच्या नात्यात फूट पडल्याचं म्हटलं जात आहे.

सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये एका Reddit यूजरने करिश्मा कपूरमुळे सलमान-ऐश्वर्याचा ब्रेकअप झाल्याचं म्हटलं आहे. इतकंच नाही तर त्याने या संदर्भातील एक आर्टिकल सुद्धा शेअर केलं आहे. या आर्टिकलमध्ये करिश्माची सलमानसोबत जवळीक वाढल्यामुळे ऐश्वर्या त्याच्यापासून दूर झाली असं म्हटलं आहे.

एका सिनेमात सलमान आणि करिश्माने एकत्र काम केलं होतं. त्यामुळे या सिनेमाच्या सेटवर त्यांच्याच चांगली मैत्री झाली होती. पण, त्यांच्यातील वाढती मैत्री पाहून ऐश्वर्याने आधीच सलमानला तिच्यापासून दूर राहण्यास सांगितलं होतं. इतकंच नाही तर, तिने करिश्मालाही त्याच्यापासून लांब रहायला सांगितलं होतं. परंतु, त्यांच्यातील मैत्री वाढतच गेली. करिश्माचं सलमानच्या घरी येणं-जाणं वाढू लागलं होतं. ज्यामुळे सलमान आणि ऐश्वर्यातील वाद वाढू लागले. परिणामी, या दोघांचा ब्रेकअप झाला, असा दावा Reddit यूजरने केला आहे.

दरम्यान, सलमान-ऐश्वर्याच्या ब्रेकअप होण्यामागची अनेक जण वेगवेगळी कारणं सांगतात. परंतु, त्यावेळी नेमकं काय घडलं होतं. हे अजूनपर्यंत सलमान किंवा ऐश्वर्या या दोघांपैकी कोणीही सांगितलेलं नाही. या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याने २००७ मध्ये अभिषेक बच्चनसोबत संसार थाटला. 

टॅग्स :करिश्मा कपूरसलमान खानऐश्वर्या राय बच्चनबॉलिवूडसेलिब्रिटी