Join us

सलमानसाठी बिश्नोईला भिडणाऱ्या सोमी अलीमुळेच तुटलेलं भाईजानचं लग्न, होणाऱ्या बायकोने पकडलं होतं रंगेहाथ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 12:30 PM

एकीकडे सलमानबरोबर लग्न करण्याचं संगीता बिजलानी स्वप्न रंगवत होती. तर दुसरीकडे मात्र सलमानचं सोमी अलीसोबत अफेअर सुरू होतं.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून वारंवार धमक्या मिळत आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकींची गोळी झाडून हत्या करण्यात आल्यानंतर बिश्नोई गँगकडून सलमानलाही टारगेट केलं जात आहे. सलमानने काळवीट मारल्याप्रकरणी माफी मागावी अशी मागणी सातत्याने बिश्नोई गँगकडून केली जात आहे. सलमानसाठी त्याची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली धावून आली आहे. सोमी अलीने थेट बिश्नोईला मेसेज करत त्याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

बिश्नोईला भेटून त्याला समजावणार असल्याचंही सोमीने म्हटलं आहे. आता सलमानसाठी धावून येणाऱ्या सोमीमुळेच भाईजानचं लग्न होता होता राहिलं होतं. वयाची पन्नाशी उलटली तरी सलमानने अद्याप लग्न केलेलं नाही. खरं तर ९०च्या दशकातच सलमान बोहल्यावर चढणार होता. १९९४ मध्ये त्याने अभिनेत्री संगीता बिजलानीसोबत साखरपुडा केला होता. ते दोघे लग्नाच्या बेडीतही अडकणार होते. सलमान आणि संगीताच्या लग्नाच्या पत्रिकाही छापल्या होत्या. 

एकीकडे सलमानबरोबर लग्न करण्याचं संगीता बिजलानी स्वप्न रंगवत होती. तर दुसरीकडे मात्र सलमानचं सोमी अलीसोबत अफेअर सुरू होतं. लग्नाच्या काही दिवस आधी संगीताने सलमान आणि सोमी अलीला एकत्र बेडरुममध्ये रंगेहाथ पकडलं होतं. त्यानंतर संगीता आणि सलमानचं लग्न मोडल्याचा खुलासा खुद्द सोमी अलीने केला होता. 

दरम्यान, काळवीटची शिकार केली तेव्हा बिश्नोई समाज त्याची पूजा करतात हे सलमानला माहीत नव्हतं, असं सोमीने सांगितलं आहे. "सलमानला हे माहीत नव्हतं की, बिश्नोई समाज काळवीटाची पूजा करतो. मला त्याच्या वतीने माफी मागायची आहे. सलमानच्या मागे लागू नका. माझा सलमानशी काहीही संबंध नाही. २०१२ मध्ये मी त्याच्याशी शेवटचं बोलली होती. मला फक्त एवढंच वाटतं की, कोणाचीही हत्या होऊ नये. माझा यामध्ये कोणताच फायदा नाही", असं सोमी म्हणाली होती. 

टॅग्स :सलमान खानसोमी अलीसेलिब्रिटी