Join us  

'त्याच्या डोक्यात हवा गेलीये'; प्रसिद्ध निर्मात्याने डागलं कार्तिक आर्यनवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2024 1:02 PM

Sandeep Singh: संदिप आणि कार्तिक एकेकाळी चांगले मित्र होते. मात्र, आता कार्तिकने त्याच्याशी मैत्री तोडल्याचा आरोप या निर्मात्याने केला आहे.

कोणत्याही गॉडफादरशिवाय इंडस्ट्रीत आपलं हक्काचं स्थान निर्माण करणारे कलाकार फार मोजके आहेत. यातलच एक नाव म्हणजे अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan). उत्तम अभिनय आणि पर्सनालिटीच्या जोरावर कार्तिकने इंडस्ट्रीत त्याची जागा निर्माण केली. विशेष म्हणजे कोणतंही फिल्मी बँकग्राऊंड नसतांनाही स्ट्रगल करत तो या जागी पोहोचला. इतकंच नाही तर कार्तिक त्याच्या साधेपणामुळेही कायम चर्चेत असतो. परंतु, सध्या तो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. प्रसिद्ध निर्माता संदिप सिंह (Sandeep Singh) यांनी कार्तिकवर टीकास्त्र डागलं आहे.

सध्या सोशल मीडियावर संदिपची एक जुनी मुलाखत चर्चेत येत आहे. संदिपने सिद्धार्थ कननला ही मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने कार्तिकविषयी काही खुलासे केले. एकेकाळी कार्तिक आणि मी एकत्र उठलो-बसलो आहोत, एकत्र जेवलो आहोत. पण, आता कार्तिकला माझ्याशी बोलायला सुद्धा वेळ नाही, असं संदिपने या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.

"तुमच्या शोमध्ये आज मी एका गोष्टीवर बोलतो. माझा एक मित्र आहे जो आज खूप मोठा सुपरस्टार झालाय. ज्यावेळी तो स्टार नव्हता त्यावेळी तो प्रत्येक गोष्टीत माझा सल्ला घ्यायचा. आणि, आता त्याला माझ्याशी फोनवर बोलायला सुद्धा वेळ नाही. तो मित्र म्हणजे कार्तिक आर्यन. एकेकाळी आम्ही दोघं एकत्र हिंडायचो, फिरायचो, एकत्र जेवायचो. मी सगळ्यांसोबत त्याची ओळख करुन द्यायचो. भूषण कुमार आणि रमेश तौरानीसोबत मीच कार्तिकची पहिली ओळख करुन दिली होती",असं संदिप म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "एकेकाळी आमची चांगली मैत्री होती पण आता तो मला इग्नोर करतो. माझा साधा फोनही तो उचलत नाही. कार्तिकला मी एक मेसेज केला होता. त्यात म्हटलं होतं, जेव्हा जेव्हा एखादा फुगा फुगतो त्यावेळी त्याला विसर पडतो की तो पूर्वी कोण होता. मी कार्तिकला माझ्या सफेद या सिनेमाचा ट्रेलर पाठवला होता. पण, त्याने तो कुठेच शेअर केला नाही. मला वाटतंय ज्यावेळी तो स्टार नव्हता त्यावेळी मी त्याला ओरडलो होतो आणि त्याचा राग त्याने अजूनही मनात ठेवलाय. जर असं असेल तर तू त्याचवेळी मला का नाही बोललास?"

दरम्यान, "माझ्या 'सफेद' या सिनेमाचा ट्रेलर संजय दत्त, हिमेश रेशमिया, विवेक ओबेरॉय, राजकुमार राव या कलाकारांनीही शेअर केला. मला वाटलं होतं ज्यावेळी तो स्टार होईल तेव्हा माझ्याकडे येऊन म्हणेल की, चल आपण एक सिनेमा करुयात. तो खरंच एक चांगला मुलगा आहे. मात्र, त्याच्या डोक्यात यशाची हवा गेलीये. मी त्याला आमचे जुने फोटो पाठवतो पण तो त्यावरही काहीच रिप्लाय देत नाही. मला त्याला इतकंच सांगायचंय वेळ, परिस्थिती बदलते पण नाती कायम तशीच राहतात", असं म्हणत संदिपने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

टॅग्स :बॉलिवूडकार्तिक आर्यनसेलिब्रिटीसिनेमा