Join us  

बंगळुरूसारख्या घटना टाळण्यासाठी शाहरुख खानकडे आहे रामबाण उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2017 10:44 AM

बंगळुरूमध्ये नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी जमलेल्या तरुणींना एका लाजिरवाण्या घटनेला सामोरे जावे लागले. पोलिस बंदोबस्त असूनही काही तरुणांनी भर ...

बंगळुरूमध्ये नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी जमलेल्या तरुणींना एका लाजिरवाण्या घटनेला सामोरे जावे लागले. पोलिस बंदोबस्त असूनही काही तरुणांनी भर रस्त्यांवर मुलींची छेड काढली. या घटनेचे सगळीकडेच तीव्र प्रतिसाद उमटले. आजच्या प्रगत व आधुनिक भारतात अशा प्रकारच्या घटना घडू शकतात यावर अनेकांना आश्चर्य वाटत आहे.बॉलीवूड सेलिब्रेटींनी बंगळुरूमधील या घटनेचा निषेध केला आहे. शाहरुख खानने निंदा करत भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून एक उपाय सांगितला आहे. एका सेवाभावी कार्यक्रमात सहभागी झालेल्या शाहरुखला जेव्हा याबाबत विचारले असता तो म्हणाला की, ‘बंगळुरूसारख्या सुशिक्षित शहरात महिलांवर अशाप्रकारे अत्याचार होणे आपल्या सर्वांसाठी लाजिरवाणी बाब आहे. मी तर म्हणतो की, पालकांनी मुलांना मुलींचा आदर करण्याची शिकवण बालपणापासूनच दिली तर कदाचित या घटना टाळल्या जाऊ शकतात.’ म्हणजे शाहरुखला वाटते की, मुलांवर योग्य संस्कार करूनच महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांना आळा घातल्या जाऊ शकतो. किंग खानबरोबरच ‘मि. परफे क्शनिस्ट’ आमिर खाननेसुद्धा आपली नाराजी बोलून दाखविली. काही दिवसांपूर्वी तो म्हणाला होता की, ‘ही घटना पाहून मन सुन्न होऊन जाते. खूप लाज वाटते. सरकारने काही तरी कडक पाऊले उचलून याबाबत काही तरी ठोस उपक्रम हाती घेणे गरजेचे आहे. गरज पडल्यास कायदा कठोर करा. असे केल्यावर कठीण शिक्षा होऊ शकते असे दिसल्यावर कदाचित लोक स्वत:ला अशा वागण्यापासून दूर ठेवतील.’सामाजिक विषयांवर नेहमी भाष्य करणाऱ्या अक्षय कुमारने तर म्हटले की, या घटनेनंतर मला स्वत:ला माणूस म्हणून घ्यायची लाज वाटते. त्याने फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट करून आपले मत मांडले आहे. तो म्हणाला, ‘आज मला माणूस असल्याची लाज वाटतेय. कुटुंबासोबत छोटी सुट्टी एन्जॉय करुन केपटाऊनहून परतलो. तुम्हाला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. माझ्या मुलीला कुशीत घेऊन एअरपोर्टवरुन बाहेरच पडत होतो, तोपर्यंत टीव्हीवरील एका बातमीवर नजर गेली. बंगळुरुमध्ये नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये नंगा नाच पाहिला, भर रस्त्यात ते पाहून तुम्हाला कसं वाटलं हे माहित नाही, पण माझं रक्त खवळलं. एका मुलीचा बाप आहे. जरी नसतो तरी हेच बोललो असतो की, जो समाज आपल्या महिलांना आदर देऊ शकत नाही त्याला माणूस म्हणवून घेण्याचा अधिकार नाही.’