रणदीप हुड्डा (randeep hooda) हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. रणदीप त्याच्या सिनेमांमुळे आणि वक्तव्यांमुळे चांगलाच चर्चेत असतो. रणदीपची भूमिका असलेला 'जाट' सिनेमा नुकताच रिलीज झाला. या सिनेमाच्या निमित्ताने रणदीपने एका पॉडकास्टला मुलाखत दिली. त्यावेळी रणदीप महात्मा गांधींची हत्या,नथुराम गोडसे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या मुद्द्यावर त्याचं स्पष्ट मत व्यक्त केलं. काय म्हणाला रणदीप?
रणदीपने शुभांकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये याविषयी खुलासा केला. तो म्हणाला की, "सावरकरांच्या चांगल्या गोष्टींना लपवलं गेलं. ते काँग्रेसच्या विरुद्ध असल्याने त्यांना बदनाम केलं गेलं. सावरकरच होते जे काँग्रेससमोर स्वतःची भूमिका मांडायला उभे राहायचे. जेव्हा गांधीजींची हत्या झाली तेव्हा सावरकरांचा त्या घटनेशी काही संबंध नव्हता. मुख्य गोष्ट ही आहे की, सावरकरांचा जर या प्रकरणाशी संबंध असता तर हिंदू महासभेशी ज्या व्यक्ती जोडलेल्या आहेत त्यांच्याशी त्यांनी याविषयी कोणताच संवाद साधला नसता. गोडसेजींना त्यांनी काही सांगितलं नसतं."
यादरम्यान पॉडकास्टच्या अँकरने रणदीप 'गोडसेजी' म्हणाला, त्यावर बोट ठेवलं. "तुम्हाला यामुळे लोकांची नाराजी सहन करावी लागेल", असं अँकरने म्हणताच रणदीप म्हणाला की, "जगाचा निरोप घेतल्यावर सर्वजण महात्मा बनतात. एखाद्या व्यक्तीला आदर देण्यामध्ये कोणती अडचण आहे. ते सुद्धा एक माणूस होते." अशाप्रकारे रणदीप या पॉडकास्टमध्ये व्यक्त झाला. रणदीपने २०२४ मध्ये आलेल्या 'वीर सावरकर' सिनेमात स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका साकारली होती.