'छावा' (Chhaava Movie) चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित हा हिंदी सिनेमा 14 फेब्रुवारी रोजी रिलीज येत आहे. अभिनेता विकी कौशलने (Vicky Kaushal) छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत आहे. सिनेमाच्या प्रमोशन निमित्ताने विकी कौशलने 'लोकमत' शी साधलेला मनमोकळा संवाद साधला. यावेळी विकी कौशलनं महाराजांची भुमिका साकारण्यासाठी कोणत्या गोष्टींचं प्रशिक्षण घेतलं, याचा खुलासा केलाय.
विकी कौशलनं महाराजांची भुमिका साकराण्यासाठी घेतलेली मेहनत आणि महाराजांकडून शिकलेल्या गोष्टींबद्दल सांगितलं. तो म्हणाला, "मी आणि उतेकर सर 'जरा हटके जरा बचके' या सिनेमाचं शूटिंग करत होतो. तेव्हाच मला सरांनी पुढचा चित्रपट 'छावा' करुयात असं सांगितलं. मी खूप उत्सुक होतो. मला महाराजांबद्दल माहिती होतं. पण, या चित्रपटाच्या निमित्ताने मी खूप गोष्टी वाचल्या. मला सरांनी महाराजांबद्दल पहिलं वाक्य सांगितलं होतं, ते म्हणजे, राजेंची तलवार ६० किलोंची होती. ती ६० किलोची तलवार फक्त उचलायची नाहीये, तर त्याने लढाई करायची आहे. हे सगळं ऐकूनच मी थक्क झालो. मला वजन वाढवावं लागेल हे लक्षात आलं. मग मी २५ किलो वजन वाढवलं. माझं वजन तेव्हा ८० किलो होतं, ते मी जवळपास १०५-१०६ किलोपर्यंत वाढवलं".
पुढे तो म्हणाले, "दोन गोष्टी मला सरांनी अगदी स्पष्टपणे सांगितल्या होत्या. त्या म्हणजे, तुला घोडेस्वारी आलीच पाहिजे, त्यात कोणतीच सूट नसेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तलवारबाजी. तलवारबाजीत एकदम पारंगत असलं पाहिजे. तलवारबाजी करताना जणू तो तुझा तिसरा हात आहे असं वाटलं पाहिजे. या सगळ्या तयारीसाठी मला ७ ते ८ महिने लागले. त्यानंतर सरांना सगळ्या गोष्टी योग्य वाटल्या. त्यानंतरच आम्ही शूटिंगला सुरुवात केली".
"आमचं शूटिंग जवळपास ६ ते ७ महिने सुरू होतं. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या व्यक्तिरेखा जशाच्या तशा साकारणं हे कोणालाच शक्य नाही. कारण राजे महान होते. आज त्यांची भूमिका साकारताना फक्त आपण १०० टक्के देऊ शकतो. मी माझ्या बाजूने पूर्ण प्रयत्न केले".
महाराजांकडून कोणते गुण घेतले, याबद्दल तो म्हणाला, "या प्रवासात महाराजांबद्दल मी जे काही शिकलो, ते आता मला आयुष्यभर लक्षात राहणार आहे. त्याचा एक होता. म्हणजे शंभूराजे शिवाजी महाराजांसोबतत आग्र्याला गेले, तेव्हा ते फक्त ९ वर्षांचे होते. त्यांना १३ भाषा अवगत होत्या. त्यांचे सर्व पैलू पाहिल्यानंतर कळतं की ते महान होते. शिवाजी महाराजांचा वारसा पुढे चालवणं ही एक मोठी जबाबदारी होती. त्यांचं व्यक्तिमत्व परिपूर्ण होतं. महाराजांचा इतिहास पाहायला गेलं तर, आज मी ३७ वर्षांचा आहे आणि मी रेतीच्या एका कणाएवढं जीवनही जगलो नाहीये. ही एक कथा नाही, ही तर सत्य घटना आहे. वाघाचा जबडा फाडलाय तर फाडलाय, हे सर्व खरं आहे".