क्रिकेटर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांचा अखेर घटस्फोट झाला आहे. आज मुंबईतील बांद्रा येथील कौटुंबिक न्यायालयात त्यांच्या घटस्फोटाची अंतिम प्रक्रिया पार पडली. २०२० साली दोघं लग्नबंधनात अडकले होते. लग्नानंतर ४ वर्षांनी आता ते कायमचे वेगळे झाले आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून ते वेगळे राहत होते अशीही माहिती त्यांनी कोर्टात दिली होती.
हार्दिक-नताशानंतर क्रिकेट आणि कला विश्वातील आणखी एका जोडप्याचा आज घटस्फोट झाला. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा लग्नानंतर ४ वर्षांनी विभक्त झाले आहेत. युजवेंद्र चहल याची बाजू मांडणारे वकिल नितीन कुमार गुप्ता यांनी सांगितले, "घटस्फोटाचा अंतिम निकाल देण्यात आला आहे. दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे म्युच्यूयल डिव्होर्स साठी अर्ज केला होता. आज त्यावर घटस्फोटाचा हुकूमनामा ( Divorce Decree) देण्यात आला आहे. आज या दोघांचे लग्न कायदेशीरपणे संपुष्टात आले आहे. आता ते दोघे त्यांच्या आयुष्यातील निर्णय घेण्यासाठी एकमेकांपासून स्वतंत्र आहेत." यानंतर पत्रकारांनी त्यांना पोटगीचा प्रश्न विचारला. यावर 'काहीच नाही' म्हणत त्यांनी उत्तर देणं टाळलं.
किती रुपये पोटगी दिली जाणार?
युजवेंद्र चहल याने घटस्फोटाच्या अर्जाच्यावेळीच ४ कोटी ७५ लाखांची पोटगी देण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले होते. या मुद्द्यावर न्यायालयाने होकार दर्शवला आणि दोन्ही बाजूंच्या सामंजस्याने म्युच्यूअल घटस्फोटाची प्रक्रिया पार पाडण्याचे निर्देश कौटुंबिक न्यायालयाला दिले. मिळालेल्या माहितीनुसार, ४.७५ कोटींच्या एकूण पोटगीपैकी २.३७ कोटींची पोटगी आधीच धनश्रीला ट्रान्सफर करून झाली असल्याचे म्हटले आहे. तर उर्वरित पोटगीची रक्कम घटस्फोटाचा जाहीरनामा मिळाल्यानंतर देण्याची तजवीज समुपदेशकाच्या मध्यस्थी करण्यात दिली.