Join us  

भावनिक स्पर्श करणारी ‘दिल से दिल तक’ मालिका नव्या वळणावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2017 4:52 AM

‘विश्वास आणि सन्मान’ यावर आधारित असलेली ‘दिल से दिल तक’ ही मालिका एका रोमांचक वळणावर येऊन ठेपली आहे. प्रेक्षकांच्या भावनांना

‘विश्वास आणि सन्मान’ यावर आधारित असलेली ‘दिल से दिल तक’ ही मालिका एका रोमांचक वळणावर येऊन ठेपली आहे. प्रेक्षकांच्या भावनांना स्पर्श करणाऱ्या या मालिकेत ‘आई’ हा विषय अतिशय संवेदनशीलपणे मांडला जात असल्याने प्रेक्षकांना मालिकेविषयी अक्षरश: ओढ लागली आहे. पार्थला गुजराती समाजातील मुलगी सोडून बंगाली समाजातल्या शोरवोरीशी लग्न करायचे होते. मात्र त्याचा हा निर्णय त्याच्या आजोबांना अजिबात मान्य नव्हता. त्यामुळे पार्थच्या आजोबांनी दोघांना स्वत:पासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला होता, असे आजवर आपल्याला पाहायला मिळाले होते. त्यानंतर काही दिवसांनंतर जेव्हा आजोबांना शोरवोरी गर्भवती असल्याचे समजले तेव्हा त्यांचे मन बदलते अन् ते दोघांनाही घरात घेण्याचा निर्णय घेतात. मात्र नियतीला काही औरच मान्य असते, एका घटनेत शोरवोरीला तिचे बाळ गमवावे लागते. त्यामुळे पार्थचा परिवार तिला पुन्हा स्वीकारणार का? याचीही भीती तिला वाटते. ही बाब पार्थची आई इंदू यांना चांगली ज्ञात असते, त्यामुळे त्या तिला हा संपूर्ण प्रकार पार्थच्या परिवारापासून लपवून ठेवण्याचा निर्णय घेतात. मात्र शोरवोरीवरील दु:ख येथेच संपत नाही, तर ती पुन्हा आई होऊ शकणार नसल्याचे तिला सांगितले जाते. या कटू सत्यामुळे ती पूर्ण हतबल होते. परंतु अशातही पार्थ तिला आधार देतो अन् हे संपूर्ण सत्य माझ्या कुटुंबातील लोकांना सांगावेच लागेल असे तो तिला म्हणतो. शोरवोरीदेखील यास होकार देते. मात्र जेव्हा ते दोघे या सगळ्या गोष्टी सांगण्याचा विचार करतात, पार्थच्या आजोबांना हृदयविकाराचा झटका आलेला असतो. आजोबांची तब्येत चांगली नसल्याने त्यांना ही गोष्ट कशी सांगायची हा त्यांना प्रश्न पडतो. त्यामुळे पार्थ आणि शोरवोरी ही बाब सगळ्यांपासूनच लपवून ठेवण्याचा निर्णय घेतात. याचदरम्यान मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत असलेली टेनी नोकरी मिळवण्यासाठी पार्थच्या मागे लागलेली असते. तिला अमेरिकेत जाण्यासाठी पार्थची मदत हवी असते. परंतु यादरम्यान तिला शोरवोरी गर्भवती नसून, ती पुन्हा कधीच आई होऊ शकणार नसल्याचेही समजते. तसेच पार्थने ही बाब त्याच्या कुटुंबीयांपासून लपवून ठेवली असल्याचेही तिला कळते. मग ती यावरूनच पार्थला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात करते. पार्थ तिच्या मागणीनुसार तिला दोन लाख रुपये देण्यास तयार होतो. एकदा पार्थ आणि शोरवोरी ‘कृष्णलीला’ कार्यक्रम बघण्यासाठी कृष्णवाटिकेत जातात. तिथे पार्थ आणि टेनी समोरासमोर येतात. टेनी पार्थला सांगतेय की, तिच्याकडे भावनांची किंमत नाही. तिला फक्त पैसा हवा आहे. तसेच ती पार्थला आणखी धमकावताना म्हणते की, तुमचे सत्य मी जगासमोर आणू शकते. त्यामुळे हतबल झालेला पार्थ शोरवोरीच्या चेहऱ्याकडे बघून काहीसा स्तब्ध होतो. त्यावेळी शोरवोरी बलरामाची कथा ऐकण्यात गुंग असते. बलरामाची कथा ऐकताना या दोघांना सरोगसीची कल्पना सुचते. सरोगसी म्हणजे शोरवोरीला मूल होत नसल्याने पार्थ आणि शोरवोरीच्या बाळाला दुसरी स्त्री जन्म देणार असे ठरते. या युक्तीमुळे काहीसा दिलासा मिळालेले हे दाम्पत्य लगेचच सरोगसी स्पेशालिस्टला भेटतात. पुढे सरोगसीसाठी ते एका महिलेची निवडही करतात. मात्र ती महिला यास तयार होत नाही. मग पार्थ टेनीला सरोगेट मदर होशील का, असे विचारण्याचा निर्णय घेतो. मात्र आडेवेडे घेणारी टेनी पुढे पैशाच्या हव्यासातून पार्थची ही आॅफर स्वीकारते. आता प्रश्न असा निर्माण होतो की, पार्थ आणि शोरवोरीला त्यांचे सत्य कुटुंबीयांपासून लपविण्यात यश मिळेल का? जर आलेच तर किती काळ हे गुपित त्यांना लपवता येईल? यासाठी पाहत राहा कलर्सवर... ‘दिल से दिल तक’ सोमवार ते शुक्रवार रात्री १०.३० वाजता.