Join us  

चित्रपटांनीही उधळले होळीचे रंग

By admin | Published: March 25, 2016 1:41 AM

सप्तरंगांचा सण म्हणजे होळी. या होळीच्या रंगात बॉलीवूडचे अनेक चित्रपटही अगदी चिंब भिजलेत. होळीची चाहूल लागली की ‘‘रंग बरसे भिगे चुनरवाली... रंग बरसे’’ तर कधी ‘‘बलम पिचकारी

सप्तरंगांचा सण म्हणजे होळी. या होळीच्या रंगात बॉलीवूडचे अनेक चित्रपटही अगदी चिंब भिजलेत. होळीची चाहूल लागली की ‘‘रंग बरसे भिगे चुनरवाली... रंग बरसे’’ तर कधी ‘‘बलम पिचकारी जो तुने मुझे मारी’’ ही गाणी अगदी हटकून कानावर पडतात. सिनेगीतांच्या माध्यमातून रूपेरी पडद्यावर नायक-नायिका नेहमीच रंगांची उधळण करीत आले आहेत. चित्रपटातील होळीच्या या रंगांनी प्रेक्षकांना इतके रंगून टाकले आहे की तो रंग अजूनही फिका झालेला नाही. जवानी दिवानीहोळीच्या रंगात रंगलेल्या नवीन चित्रपटांची चर्चा निघाली तर रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोन यांचा जवानी दिवानी हा चित्रपट नक्की आठवतो. यामधील होळीच्या पार्श्वभूमीवरील ‘बलम पिचकारी’ हे गाणे खूपच गाजले. शाल्मली खोळगडे आणि विशाल दादलानी यांनी गायलेले हे गाणे दरवर्षी होळीला सर्वांच्याच ओठांवर येते.मोहब्बते२००० साली अमिताभ बच्चन आणि शाहरूख यांचा मोहब्बते हा चित्रपट खूप गाजला. यातील ‘सोनी सोनी अखियों वाली’ हे आशा भोसले, उदीत नारायण, जसविंदर नरुला, सोनू निगम यांचे होळीगीत तरुणाई होळीला अगदी हमखास वाजवत असते.

सिलसिलाहोळी म्हटले की सर्वांच्याच ओठावर गाणे येते, ते म्हणजे ‘रंग बरसे’. १९८१ साली प्रदर्शित झालेल्या सिलसिला या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्यावर चित्रित करण्यात आलेले हे गाणे अमिताभ बच्चन यांनी स्वत: गायले आहे. होळीमध्ये हे गाणे कायम हिट ठरते.

डर१९९३ साली प्रदर्शित झालेल्या डर या चित्रपटातील ‘अंग से अंग लगाना’ हे गाणे सनी देओल, शाहरूख खान आणि जुही चावला यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. अलका याज्ञिक, सुदेश भोसले, विनोद राठोड यांनी हे गाणे म्हटले होते. नव्वदच्या दशकात हे गाणे खूपच गाजले. आजही या गाण्याची क्रेझ कमी झालेली नाही.

बागबान२००३ साली प्रदर्शित झालेल्या बागबान या चित्रपटातील अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांच्यावरील चित्रित ‘होली खेले रघुवीरा अवध में’ हे गाणे आजही लोकांना आवडते. उदीत नारायण, अमिताभ बच्चन, सुखविंदर सिंग, अलका याज्ञिक यांनी हे गाणे अगदी सुरेल म्हटले होते.

शोले‘कब है होली?’ हा शोले चित्रपटातील संवाद अजूनही लोकांच्या ओठावर आहे. १९७५ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील अमिताभ बच्चन, जयाप्रदा, धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्यावर चित्रित केलेले किशोर कुमार व लता मंगेशकर यांचे ‘होली के दिन दिल खिल जाते है’ हे गाणे जणू या चित्रपटाचा प्राण होते.

कटी पतंग१९७० साली सुपरस्टार राजेश खन्ना आणि आशा पारेख यांनी कटी पतंग या चित्रपटात ‘आज ना छोडेंगे’ हे गाणे आपल्या अभिनयाने अजरामर करून टाकले. किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेले हे गाणे त्या काळी प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले होते. या गाण्यातली रंग टाकतानाची शरारत कायम स्मरणात राहणारी आहे.

Feature
sameer.inamdar@lokmat.com