Join us  

प्रेमात पडलात तर खबरदार

By admin | Published: November 18, 2015 1:17 AM

‘प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं..’, ‘प्रेम कधी कुणावर ठरवून केलं जातं का? बस वो हो जाता है...’ अशा डायलॉगबाजीचा वापर अनेक माध्यमांतून केला गेला.

‘प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं..’, ‘प्रेम कधी कुणावर ठरवून केलं जातं का? बस वो हो जाता है...’ अशा डायलॉगबाजीचा वापर अनेक माध्यमांतून केला गेला. अगदी मालिका किंवा चित्रपटांमधून बिनदिक्कतपणे आपल्या जोडीदाराला ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे’ असं सांगणाऱ्या कलाकारांच्या असंख्य जोड्या केवळ पडद्यावरच यशस्वी ठरल्या नाही, तर वास्तविक जीवनातही लग्नाच्या बेडीत अडकल्या. मराठीमध्ये अगदी जयश्री गडकर-बाळ धुरी, रमेश - सीमा देव, सचिन-सुप्रिया पिळगावकर यांपासून ते अजिंक्य देव-पूजा पवार, उमेश कामत-प्रिया बापट, आदिनाथ कोठारे - ऊर्मिला कानिटकर यांसारख्या जोड्यांची नावे घेता येतील. आता छोट्या पडद्यावरदेखील हा टे्रंड काही प्रमाणात रुजू लागला आहे. मात्र कलाकारांच्या प्रेमावरच बंदी घालण्याचा निर्णय निर्माता मंडळींनी घेतला आहे. बघू या काय आहे हा निर्णय.. संजय-सुकन्या मोने यांच्याच पावलावर पाऊल टाकीत ‘होणार सून मी या घरची’ मालिकेमधून घराघरांत पोहोचलेल्या ‘श्री-जान्हवी’ उर्फ शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान यांनीही या पंक्तीत स्थान पटकावले आहे. त्यामुळेच चित्रपट असो किंवा मालिका यामध्ये एकत्रितपणे काम करणारे सहकलाकार एकमेकांच्या प्रेमात पडण्याचे किस्से तसे आता नवीन राहिलेले नाहीत.. मग ते क्षेत्र अगदी कुठलेही असो! प्रेम हे सहवासातून.. संवादातून.. निर्माण होते असं म्हणतात. त्याला एकही व्यक्ती अपवाद ठरणारी नाही. मात्र आता ‘प्यार किया तो डरना क्या’ असे म्हणणाऱ्या कलाकारांच्या प्रेमावरच पाबंदी घालण्याचा अजब-गजब निर्णय निर्माता मंडळींनी घेतला आहे. सहकलाकाराच्या प्रेमात पडलात तर खबरदार! असा काहीसा धमकीवजा फतवाच सिने अ‍ॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन आणि इंडियन फिल्म टेलिव्हिजन प्रोड्युसर्स कौन्सिलने काढला आहे. सेटवर उशिरा आलात किंवा सहकलाकाराच्या प्रेमात पडलात तर चक्क अंदाजे २ ते ५ लाख रुपयांपर्यंतचा दंड कलाकारांना ठोठावण्याचा कठोर निर्णय घेण्यात आला आहे. प्रेमाची स्पंदनं इतरांच्या आयुष्यात निर्माण करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या कलाकारांनाच आता प्रेमापासून पारखे राहावे लागणार आहे. सेटवर उशिरा आल्यानं निर्मात्याची सगळी गणितं बिघडतात.. त्यांना आर्थिक फटका बसतो.. प्रेमाचे सांगायचे झाल्यास एखादा कलाकार सहकलाकाराच्या प्रेमात पडला, तर त्याचा वेळ शूटमध्ये कमी आणि मेकअपरूमध्येच अधिक जातो, असे सांगून निर्मात्यांनी सहकलाकारांच्या प्रेमावरच ‘कर्फ्यू’ लावला आहे. या निर्णयाची धग अद्याप मराठी कलाकारांपर्यंत पोहोचली नसली, तरी भविष्यात या वाटेवर मराठी मालिका आणि चित्रपट निर्मातेदेखील जाऊ शकतात.. कारण सेटवर उशिरा येणं किंवा सहकलाकाराच्या प्रेमात पडणं या गोष्टी प्रत्येक कलाकाराला लागू होतात... परंतु हा अध्यादेश मराठीमध्ये लागू होण्यापूर्वीच कलाकारांनी याविरोधात नाराजीचा सूर आळवायला सुरुवात केली आहे... कोणी कुणावर प्रेम करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे... असे आता कलाकार बोलू लागले आहेत.... हा विरोध निर्मात्यांना परवडणार का? हाच खरा प्रश्न आहे! सेटवर कलाकारांनी उशिरा पोहोचल्याबद्दल निर्मात्यांनी दंड ठोठावला त्यात काहीच गैर नाही. पण एकाच मालिकेतील सहकलाकार एकमेकांच्या प्रेमात पडणे हा त्यांचा वैयक्तिक आयुष्याचा एक भाग आहे. मात्र, ते त्या कारणामुळे सेटवर उशिरा येत असतील, मेक-अप रूममध्ये उगीच वेळ काढत असतील किंवा त्यांच्यातील संबंध मालिकेमध्ये आणून कारणं देत असतील, तर त्याबद्दल दंडात्मक कारवाई झालीच पाहिजे. मात्र, ते स्वत:ची संपूर्ण जबाबदारी ओळखून काम व्यवस्थित पूर्ण करीत असतील; आणि तरीही केवळ प्रेमात पडले म्हणून दंड ठोठावला जात असेल, तर ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. - तेजश्री प्रधान, अभिनेत्री

- namrata.phadnis@lokmat.com