Join us

चित्रपट प्रदर्शनासाठी नियमावली बनवावी - स्मिता तांब

By admin | Published: February 19, 2016 2:02 AM

‘७२ मैल एक प्रवास’, ‘जोगवा’, ‘परतू’ या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनाला चटका लावणाऱ्या सशक्त स्त्रीवादी भूमिका अभिनेत्री स्मिता तांबे हिने रूपेरी पडद्यावर साकारल्या आहेत

‘७२ मैल एक प्रवास’, ‘जोगवा’, ‘परतू’ या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनाला चटका लावणाऱ्या सशक्त स्त्रीवादी भूमिका अभिनेत्री स्मिता तांबे हिने रूपेरी पडद्यावर साकारल्या आहेत. संवेदनशील व्यक्तिरेखा करताना त्यातील जिवंतपणा कायम ठेवत, एक अभिनेत्री म्हणून स्वत:ची स्वतंत्र ओळख व अस्तित्व तिने निर्माण केले आहे. सत्यकथा असो किंवा एखादी संवेदनात्मक कथा असे, वेगवेगळे विषय आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर तिने प्रेक्षकांपुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी चित्रपटसृष्टीविषयी तिचे मत, चित्रपटसृष्टीसमोरील आव्हाने आणि अपेक्षा याबाबत ‘लोकमत सीएनएक्स सेलीब्रिटी रिपोर्टर’ म्हणून स्मिता संवाद साधत आहे. मराठी सिनेमांचा प्रेक्षकवर्ग नक्कीच वाढला आहे, ही चांगली बाब आहे. परंतु अजूनही आपण चित्रपटांचे प्रमोशन योग्य प्रकारे करीत नाही. कोणताही चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्या चित्रपटासाठी प्रमोशनल ग्राउंड अ‍ॅक्टिव्हिटी व्हायला पाहिजेत. चित्रपट प्रदर्शनापूर्वी थिएटर्स उपलब्ध आहेत का, हे पाहावे. मोठ्या कंपन्या त्यांचे चित्रपट अभ्यापूर्वक प्रदर्शन करतात. ग्रामीण भागापर्यंत मराठी सिनेमा पोहोचत नाही. अशी ओरड नेहमी ऐकायला मिळते. ग्रामीण भागातील शेतकरी हे खरे मराठी सिनेमाचे प्रेक्षक आहेत. दुष्काळी परिस्थितीचा परिणाम सिनेमांवर होतो. ग्रामीण भागातील प्रेक्षकांना सिनेमाकडे खेचणे ही काळाची गरज आहे, परंतु ग्रामीण भागात किती थिएटर्स आहेत, याचादेखील विचार करायला पाहिजे. आपल्याला जर आपला सिनेमा फक्त पुणे-मुंबईपर्यंतच मर्यादित ठेवायचा नसेल, तर थिएटर्सची संख्या वाढली पाहिजे. थिएटर्स वाढले, तर मराठी प्रेक्षकांच्या संख्येत आपोआपच वाढ होईल आणि सिनेमा सर्वांपर्यंत पोहोचेल. मराठी सिनेमा हा क्लास आणि मासमध्ये अडकलाय, असे मला मुळीच वाटत नाही. कारण माझा ‘७२ मैल’ हा सिनेमा फक्त माससाठी होता असे नाही, तर तो क्लासच्या प्रेक्षकांनीदेखील कौतुकाने पाहिला. चित्रपट हा प्रेक्षकांसाठी असतो. त्यामुळे प्रत्येकाच्या वेगवेगळ््या आवडी-निवडी असतील, हे निश्चित. कलाकार हा कलाकारच असतो. त्यामुळे तो कुठे घडलाय, यापेक्षा त्याने अभिनय कसा केला, हे महत्त्वाचे. रंगभूमीवर काम करण्याची पद्धत वेगळी असते. नाटकांमध्ये काम करताना तुम्हाला थेट प्रेक्षकांना सामोरे जावे लागते. उत्तम काम करण्यासाठी माणसाने सकारात्मक राहण्याची गरज असते. मी स्वत:च्या कामाबद्दल खूप सकारात्मक विचार करते. मला खूप वेगळ्या विषयांवरील चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल खरच खूप आनंदी आहे. शूटिंगसाठी जेव्हा तुम्ही सेटवर जाता, त्या वेळी प्रत्येक कलाकाराचा इन्शुरन्स असला पाहिजे. मी एका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसाठी परदेशात गेले होते, त्या वेळी माझा इन्शुरन्स काढण्यात आला. सिनेमांच्या सेटवर दुर्घटना घडण्याची, अपघात होण्याची भीती असते. अभिनेत्यांच्या तुलनेत अभिनेत्रींना कमी पैसे मिळतात, असे बोलतात, तरी याचा अनुभव मला अजून आलेला नाही. कारण मी आजपर्यंत ज्या भूमिका केल्या, त्या सर्व वुमेन ओरिएंटेडच होत्या. मला कोणाच्या बहिणीचा किंवा हिरोईनचा रोल करावा लागला नाही. माझ्या फिल्मचा हिरो मी स्वत:च होते, परंतु काही वेळेस प्रोड्युसरकडून वेळेवर पैसे मिळत नाहीत. काही अभिनेत्रींना कमी मानधन मिळते. अशा प्रश्नांना सामोरे जायचे असेल, तर सर्व कलाकारांनी एकत्र यायला पाहिजे. कलाकारांमध्ये युनिटी असणे गरजेचे आहे. मला माझ्या मागच्या वर्षीच्या चित्रपटाचे पैसे निर्मात्याकडून अजून मिळाले नाहीत, असे प्रॉब्लेम्स येतातच. त्यामुळे असे प्रश्न सोडवायचे असतील, तर सर्व कलाकारांनी एकत्र येण्याची आवशकता आहे.शब्दांकन - प्रियांका लोंढे