Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम भागात मंगळवारी दुपारच्या सुमारास झालेल्या दहशतवादी हल्लामुळे संपूर्ण देशभरात खळबळ माजली आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेत अनेक निष्पाप नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेचा सर्वच स्तरातून तीव्र निषेध करण्यात येत आहे. अनेक राजकीय मंडळींसह, कलाकार देखील या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या घटनेचा निषेध करत आहेत. दरम्यान, पहलगाम हल्ल्यावर मराठी अभिनेता अभिजीत केळकरने सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत पोस्ट लिहली आहे.
अभिनेता अभिजीत केळकरने सोशल मीडियावर पहलगाम हल्ल्यासंबंधित तिखट शब्दांत पोस्ट लिहित त्याद्वारे म्हटलंय की, "...आता सौहार्द नको, आता घुसा आणि नकाशा कायमचा बदलून टाका...", असं त्यांने म्हटलं आहे. याच पोस्टला कॅप्शन देत अभिनेत्याने संताप व्यक्त करत लिहिलंय की, "...भिकेला लागून सुद्धा, अजूनही खुमखुमी असलेल्या भिक्कारड्या पाकिस्तानला, आता बेचिराख करायलाच हवं...". दरम्यान, सोशल मीडियावर अभिजीतने शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी समर्थन देत त्यांच्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
पहलगाममध्ये घडलेल्या या घटनेनंतर आता संपूर्ण सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. तसेच या गोळीबारात जखमी झालेल्या नागरिकांवर सध्या उपचार सुरु आहेत. दरम्यान, या दहतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाचं वातावरण निर्माण झालं असून, दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.