Anshuman Vichare Post On Pahalgam Terror Attack : जम्मू - काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी मंगळवारी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. याशिवाय या हल्ल्याचा राजकीय वर्तुळासह सिनेविश्वातून तीव्र निषेध करण्यात येत आहे. मराठीसह अनेक बॉलिवूड कलाकार देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून या घटनेबद्दल संताप व्यक्त करताना दिसत आहे. दरम्यान, या प्रकरणी लोकप्रिय मराठी अभिनेताअंशुमन विचारेने (Anshuman Vichare) शेअर केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेवर पोस्ट शेअर अंशुमन विचारेने आपलं मत मांडलं आहे. आपल्या अधिकृत इनस्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्याने लिहिलंय की, "पहलगाम नरसंहार अत्यंत भयानक आणि प्रचंड चीड आणणारा आहे. याला कारणीभूत असलेल्या प्रत्येक देशद्रोही दहशतवाद्यांचा कायमचा नायनाट हीच श्रद्धांजली असेल. आता यात राजकारण नको. नाहीतर अजून सामान्य माणसाला बळी जावं लागेल." अशी सूचक पोस्ट त्याने लिहिली आहे.
नेमकं काय घडलं?
जम्मू-काश्मीरमध्ये हल्ला झाला तेव्हा दहशतवादी पोलिसांच्या वेशात होते. त्यामुळे पर्यटकांना त्यांचा संशय आला नाही. हल्लेखोर दहशतवादी ८ ते १०च्या संख्येतील असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. दहशतवाद्यांनी ४० पर्यटकांना घेरुन आधी त्यांची नावे विचारली आणि विशिष्ट धर्मीय नावे असलेल्या पर्यटकांना गोळ्या घातल्या, असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या हल्ल्यात नौदलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचाही मृत्यू झाला.