Santosh Juvekar: संतोष जुवेकर (Santosh Juvekar) हे नावा आता मराठीपुरत मर्यादित राहिलं नसून बॉलिवूड इंडस्ट्रीत प्रसिद्ध झालं आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' (Chhaava)चित्रपटात रायाजी मालगेंची भूमिका साकारुन अभिनेता चर्चेत आला. दरम्यान, या चित्रपटाच्या निमित्ताने एका मुलाखतीमध्ये "मी अक्षय खन्नाशी बोललो नव्हतो", असं संतोष म्हणाला. यामुळे त्याला ट्रोल केलं गेलं. याप्रकरणी संतोष जुवेकरने एका मुलाखतीमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
संतोष जुवेकरने 'तारांगण'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मनातील खदखद व्यक्त केली. शिवाय नेटकऱ्यांना प्रेमाचा सल्ला देखील दिला आहे. या मुलाखतीमध्ये अभिनेता म्हणाला, "मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे, जे काही तुम्ही कुणाबद्दल शब्द वापरता ते सोशल मीडियावर असो मैत्रीत असो, चार-चौघात असो किंवा बिल्डिंगमध्ये असो तुम्ही जेव्हा शब्द वापरता तेव्हा ते जपून वापरा. ते फार गरजेचं असतं. कारण आपण बोलून जातो पण, त्याचा आघात समोरच्या व्यक्तीवर ज्या पद्धतीने होतो त्याबद्दल आपल्याला कल्पना नसते. त्याच्या कुटुंबाला ते जाणवतं."
त्यानंतर संतोष जुवेकरने म्हटलं, "थोडं समजून घ्या. मान्य आहे राग आला पाहिजे. जसं आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो तसं त्याच्यावर रागावलं देखील पाहिजे. पण, शेवटी कुठे ना कुठेतरी त्या व्यक्तीने चांगलं काम केलं असेल या गोष्टी देखील आपण आठवल्या पाहिजेत." असं म्हणत संतोष जुवेकरने त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या.