Swapnil Rajeshekhar Post: भारताचे माजी क्रिकेटपटू आणि भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहिलेले संजय बांगर यांचा मुलगा आर्यन बांगर लिंगबदल करून मुलगी बनल्याची बरीच चर्चा सोशल मीडियावर झाली होती. लिंगबदल शस्त्रक्रिया करुन आर्यनची अनाया झाल्यावर ती नुकतीच भारतात परतली आहे. त्यामुळे अनाया बांगर चर्चेत आली आहे. लिंगबदल केल्यामुळे अनायाला असंख्य अडचणींचा सामना करावा लागला. आता अनाया याबाबत 'तुला शिकवीन चांगलाच धडा' फेम अभिनेते स्वप्नील राजशेखर यांनी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमुळे ते चर्चेत आले आहेत.
नुकतीच अभिनेते स्वप्नील राजशेखर आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्यामध्ये लिहिलंय, “तू वैयक्तिक कुणाचं काही नुकसान केलेलं नाहीयेस.. तरी तुला अशा इतक्या hate comments का येतात ? माहिती नाही, कदाचित या लोकांच्या आयुष्यात अनेक insecurities आहेत आणि मी या बदललेल्या शरीरातसुध्दा इतकी secured आहे. याचा त्रास त्यांना होत असावा. अनाया शांतपणे सांगत होती. हे पाहा दुःख, किंवा पाहा मी कशी अन्यायग्रस्त अशा कुठल्याही अभिनिवेषाशिवाय..., लहान वयात इतकी शारीरिक, मानसिक आंदोलनं अनुभवून आलेल्या maturity मुळे, मी तरी एका privileged कुटुंबातून आलेय.. ज्यांना जन्मजात कसल्याच सुविधा मिळाल्या नाहीयेत अशा transgenders च्या अवस्थेची कल्पना करु शकत नाही. अनाया मनापासून बोलत होती. प्रसिद्ध क्रिकेटर संजय बांगरचा पुर्वाश्रमीचा क्रिकेटर मुलगा आर्यन बांगर, आता लिंगबदल शस्त्रक्रिया करुन अनया बांगर झालाय. तिच्या नव्या मुलाखतीत आपले भलेबुरे अनुभव सांगताना, काही सहक्रिकेटपटूनी किंवा कोण्याएका सिनिअर क्रिकेटपटूने आपला लैंगिक फायदा घेण्याचा प्रयत्न केला हे तिने सांगितलं आणि प्रसिद्धी माध्यमांना खाद्य मिळालं. त्यांनी नव्याने अनयाला कॅश करायला सुरुवात केलीय."
यानंतर पुढे अभिनेत्याने लिहिलंय, "पण सौरभ द्विवेदीने घेतलेली अनयाची मुलाखत पाहताना माझ्या मनात करुणा दाटून येत होती ती माझ्यातल्या अपराध भावनेनं. तिला अशा करुणेची गरज नाही. ती सक्षम आहे. मी स्वतः सुध्दा माझ्या वयाच्या २५ पर्यंत transphobia ( तिरस्कार) ग्रस्त होतो. नंतर कधीतरी हळुहळु माणुसपण समजू लागलं. जातपात धर्मवर्ण सोबतच लिंगभेद किती हिन आहे याची जाणीव झाली. अन मग LGBTQ+ समजून घेण्याची प्रक्रियाही सुरु झाली. अपराध भावना त्याआधीच्या माझ्या मुर्खपणामुळे आजही येते. आपल्या संघर्षाबद्दल सांगताना अनाया म्हणाली, “यातलं मानसिक द्वंद्व खूप कठीण आहे. आपलं मन, मेंदु आणि आपलंच आरशात दिसणारं शरीर यांच्यात ताळमेळ नसणं, एकात्मता नसणं आणि कालांतराने त्या शरीराबद्दल घृणा वाटू लागणं हा सगळा अनुभव भयंकर आहे."
"आधीही खुपदा हे ऐकून, वाचून हे पुन्हा ऐकताना मी नव्याने शहारलो. अनया आणि तिच्यासारखे लाखो LGBTQ+ समुहातले लढत राहतील.. त्यांची चिंता नको… त्यांचा लढा दुर्दैवी तरी अपरिहार्य आहे. पण, अनया सारख्यांच्या पोस्टस खालच्या बहुतांशी भयंकर, गलिच्छ, हिंसक, मूर्ख कमेंट्स वाचल्यानंतर कळतं की, आजही आजारी आपण आहोत समाज म्हणून आणि आपल्या आजाराची चिंता करण्याची जास्त गरज आहे. देव भलं करो समस्तांचं!!" अशी पोस्ट अभिनेत्याने लिहिली आहे.