Join us

"पंधरा दिवसांपूर्वीच तो फोन करुन म्हणाला की..."; अतुल परचुरेंसोबतचं शेवटचं बोलणं मिलिंद गवळींनी सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 4:56 PM

मिलिंद गवळींनी अतुल परचुरेंच्या निधनानंतर त्यांच्याविषयीची भावुक आठवण सर्वांसोबत शेअर केलीय (milind gawali, atul parchure)

अभिनेते अतुल परचुरे यांचं काल वयाच्या ५७ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झालं. अतुल परचुरेंचं निधन झाल्यावर आई कुठे काय करते फेम अभिनेते मिलिंद गवळींनी परचुरेंविषयी भावुक आठवण सांगितली. मिलिंग गवळी लिहितात, "यारो का यार अतुल परचूरे, मी आजपर्यंत त्याला अतुल या नावाने कधीच हाकच मारली नाही, मी त्यला नेहमी "अतुलनीय"असंच म्हणायचो, आणि तो मला "बोल मित्रा" म्हणायचा, काल आपल्या सगळ्यांना सोडून गेला, fighter होता, मृत्यूची झुंज देऊन परत आला होता, खूप लडला पण शेवटी 'नियतीच्या पुढे कोणाचं काही चालत नाही' असं म्हणतात तेच खरं आहे."

मिलिंद गवळी पुढे लिहितात, "अतुल इतका talented होता, इतका हुशार होता, कलाकार म्हणून खूप वरच्या दर्जाचा होता, १९९७ ला "सुन लाडकी सासरची" या वि.के.नाईकांच्या चित्रपटांमध्ये मी आणि अतुल एकत्र काम केलं होतं, पुण्याच्या ग्वालियर पॅलेसमध्ये आम्ही एका रूममध्ये जवळजवळ 50 दिवस एकत्र राहिलो होता,त्यावेळेला त्याने "व्यक्ती आणि वल्ली" हे पु. ल. देशपांडे यांचं नाटक केलं होतं, आणि अतुल पु. ल. देशपांडे यांच्या भूमिकेमध्ये होता, तो इतका प्रतिभावान होता की पु. ल. देशपांडे यांनी स्वतः अतुलची निवड केली होती, तासनतास मंत्रमुग्ध होऊन त्याच्याकडून चितळे मस्त, अंतू बरवा, सखाराम गटणे, नाथा कामत ऐकत बसायचो.नंदा प्रधान या व्यक्तिरेखेवर सिनेमा करूयात असं आमच्या दोघांचा ठरलं होतं. त्या सिनेमाच्या shooting चे अतुल बरोबर चे दिवस अविस्मरणीय आहेत, या चित्रपटानंतर २७ वर्ष लोटून गेली, पण त्यानंतर आम्ही एकत्र कधी काम केलच नाही, वर्षानूवर्ष फक्त खंत व्यक्त करत राहीलो आपण एकत्र काम करूया."

मिलिंद गवळी पुढे लिहितात, "इतके वर्षत आमच्या भेटीगाठी फारच कमी होत असे पण मैत्री, एक मेकांन बद्दलचं प्रेम, आणि एकमेकांबद्दलचा आदर कायमच राहिला, मध्येच कधीतरी "आई कुठे काय करते"चा एखादा सीना त्याला आवडला की तो फोन करून माझं कौतुक करायचा. अगदी पंधरा दिवसांपूर्वीच अतुलचा फोन आला होता म्हणाला "आपण नाटक करूया ?" "दोन वडिलांची एक गोष्ट आहे, खूप छान सब्जेक्ट आहे". अतुल खूप हुशार, जिद्दी, आशावादी होता, आपल्याला सोडून गेला आहे हे अजून ही खरं वाटत नाही."

मिलिंद गवळी पुढे लिहितात, "त्याच्या आजाराची त्याने खूप झुंज दिली,खूप लडला, पण आज खूप मोठी पोकळी निर्माण करून गेला, अतुल आपल्यामध्ये नाही आहे, किंवा आता आपण त्याच्याशी कधी बोलू शकणार नाही, हे अजूनही मनाला पटत नाही, अतुल सारखे माणसं जेव्हा आपल्याला सोडून जातात तेव्हा कुटुंबाचं, मित्र मंडळींचं नुकसान होतच पण त्याचबरोबर समाजाचा आणि कलाक्षेत्राचा खूप मोठा नुकसान होतं. अतुलचं कायम माझ्या मनामध्ये एक वेगळं स्थान राहणार, आजपासून शरीराने तो आपल्याबरोबर नसला तरी एक उमदा कलाकार आणि एक सच्चा मित्र म्हणून कायम आपल्या हृदयामध्ये जिवंत राहणार. त्याच्या कुटुंबीयांना आणि त्याच्या असंख्या मित्रपरिवाराला परमेश्वर हे दुःख झेलायची शक्ती देवो."

टॅग्स :अतुल परचुरेमिलिंद गवळी