अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni )या नावाची नव्यानं ओळख करून देण्याची गरज नाही. हरहुन्नरी कलाकार म्हणून ओळखल्या जाणा-या याच अभिनेत्याचा आज वाढदिवस...हिंदी, मराठीसह तेलगू, कन्नड, मल्याळम, तामिळ अशा विविध भाषांमध्ये एकापेक्षा एक सरस चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप सोडणारा अतुल कुलकर्णी एक उत्तम अभिनेता तर आहेच. शिवाय निमार्ताही आहे. इतकंच नाही तर आता लेखक ही त्याची नवी ओळखही रूढ होऊ पाहते आहे. आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या आगामी चित्रपटाचं लेखन अतुलनं केलं आहे.अतुलच्या लव्हस्टोरीबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...
गीतांजली व अतुलची लव्हस्टोरी हटके म्हणता येईल. एका मुलाखतीत अतुलने ही हटके लव्हस्टोरी उलगडली होती. ‘मी आणि गीतांजली आम्ही दोघं दिल्लीत नॅशनल स्कूल आॅफ ड्रामामध्ये एकत्र शिकत होतो. मी दुस-या वर्षाला होतो तर गीतांजली पहिल्या वर्षाला. म्हणजेच ती माझी ज्युनिअर होती. मराठी विद्यार्थ्यांचा आमचा एक ग्रूप होतो. आम्ही धम्माल मज्जा करायचो. गीतांजलीही या ग्रूपमध्ये होती. एकदा आम्ही इंडिया गेटवर फिरायला गेलो असता गीतांजलीने पुढाकार घेतला आणि मला लग्नासाठी प्रपोज केलं. मी थोडा वेळ घेतला पण काहीच दिवसांत तिला होकार कळवला,’ असं त्यानं सांगितलं होतं.
अतुलची पत्नी गीतांजली ही सुद्धा एक अभिनेत्री आहे. अतुल व गीतांजलीच्या लग्नाला 25 वर्षे झालीत. पण अद्याप त्यांना मूल नाही. याचं कारण म्हणजे, दोघांनीही अगदी ठरवून स्वत:चं मुलबाळ होऊ दिलं नाही. या निर्णयामागचं कारणही खास आहे. ते म्हणजे, दोघांनाही पारंपरिक नवरा-बायको अशी चौकट मान्य नाही. अतुलने एका मुलाखतीत याबद्दल सांगितलं होतं. आम्ही दोघेही पती-पत्नीपेक्षा एकमेकांचे चांगले मित्र आहोत. आम्हा दोघांनाही पारंपरिक लग्न, नवरा-बायको ही चौकट मान्य नाही. आम्हा दोघांचे स्वतंत्र जग आहे आणि हेच आमच्यासाठी खूप आहे. याचमुळे आम्ही अगदी ठरवून स्वत:चं अपत्य होऊ दिलं नाही, असं तो म्हणाला होता.